Marathas Capture of Delhi (1771) : मराठ्यांनी  पानीपतच्या पराभवाचा कलंक दिल्ली काबीज करुन 10 वर्षांनी पुसला. 1761 ला मराठ्यांचा पानीपतच्या युद्धात पराभव झाला होता. अखेर 10 वर्षांनी त्या पराभवाचा वचपा काढत मराठ्यांनी दिल्लीत भगवा फडकवला. मराठ्यांनी 7 फेब्रुवारी 1771 मध्ये दिल्ली शहर जिंकले आणि लाल किल्याला वेढा दिला. 10  फेब्रुवारी 1771 ला मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून नजिबखानाचा पुत्र झाबेदाखान यास कैद केले आणि दिल्लीवर भगवा फडकाविला. या इतिहासाला 10 फेब्रुवारी 2022 ला 251 वर्ष पूर्ण होत आहेत. मराठ्यांच्या फौजांनी 1771 मध्ये पानीपतचा बदला घेत पानीपत, सोनपत, बागपत, कुंजपुरा, शामली, फत्तरगड, घोसगड आणि नजिबाबाद जिंकून घेतले. नजीबखानने पानिपतात लुटलेली तीस लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी पुन्हा मिळवली. शेकडो मराठा स्त्रियांना मुक्त केले. नजीबखानाची कबर उखडून गंगेत मिसळून मराठ्यांनी पानीपताचा बदला पूर्ण केला. यामुळे अब्दालीला पुन्हा हिंदुस्थानात येण्याची हिंमत झाली नाही. 


पानीपतानंतर अब्दालीचा हस्तक नजीबखान रोहिला दिल्लीवर कब्जा करुन होता. परकीय आक्रमणापासून दिल्ली आणि हिंदुस्थानचे रक्षण करणारा कोणी नव्हता. त्याचा फायदा घेत इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया देशात घातला. एवढेच नव्हे तर शाहआलम बादशहाला पाटण्यात नजरकैद केले. त्यावेळी बादशहाने माधवराव पेशवे व महादजी शिंदे यांच्याशी संधान बांधून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवण्याची विनंती केली. माधवरावांनी हे आव्हान स्विकारले, मराठ्यांच्या फौजा दिल्लीकडे रवाना झाल्या. हे समजताच घाबरलेल्या नजीबखानने मराठ्यांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. पण मराठ्यांनी तो झिडकारला. 8 फेब्रुवारी 1771 मध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकली. 10 फेब्रुवारी 1771 रोजी मराठ्यांनी लाल किल्ला जिंकून शिवरायांचा भगवा त्यावर फडकवला होता.


14 जानेवारी 1761 या दिवशी पानिपतमध्ये परकीय अब्दालीविरुद्ध झालेल्या संघर्षात एक लाख मराठ्यांनी बलिदान देऊन देशाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. युद्धामध्ये जरी अब्दालीचा विजय झाला तरी ध्येयामध्ये मराठे विजयी झाले. कारण त्यानंतर अब्दाली पुन्हा कधीही दिल्लीपर्यंत येऊ शकला नाही. पानिपतनंतर अब्दालीचा हस्तक देशद्रोही नजीबखान रोहिला दिल्लीवर कब्जा करून अत्याचार, लुटालूट करीत होता. परकीय आक्रमणापासून हिंदुस्थान आणि दिल्लीचे रक्षण करणारी कोणतीही शक्तिशाली भारतीय राजसत्ता नव्हती. त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी हिंदुस्थानात आपल्या सत्तेचा पाया घातला. एवढेच नव्हे, तर शाह आलम बादशहालाही पाटण्यामध्ये नजरकैदेत ठेवले होते.


महादजी शिंदेचा पराक्रम


नानासाहेब पेशव्यांच्या अकाली निधनानंतर 17 वर्षांच्या माधवराव पेशव्यांवर मराठी राज्याची जबाबदारी आली. अशा संकटसमयी माधवरावांनी धीरोदात्तपणाने महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या साह्याने मराठी साम्राज्य पुन्हा सावरण्याचा प्रयत्न सुरू केला. इंग्रजांच्या नजरकैदेत असलेल्या शाह आलम बादशहाने माधवराव पेशवे आणि महादजींकडे संधान बांधून आपणास पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची विनंती केली. माधवरावांनी हे आव्हान स्वीकारले व विसाजीपंत बिनीवाले आणि रामचंद्र कानडे यांच्याबरोबर पन्नास हजारांची फौज देऊन उत्तरेकडे महादजी व तुकोजींच्या मदतीस रवाना केली. आता महादजी व तुकोजींच्या नेतृत्वाखाली मराठे अब्दालीचा अफगाण हस्तक नजीबखानाच्या ताब्यातून दिल्ली मुक्त करण्याच्या कामगिरीवर निघाले. हे वर्तमान समजताच भयभीत झालेल्या नजीबखानाने मराठ्यांकडे तहाचा प्रस्ताव पाठविला. परंतु महादजींनी तो झिडकारला.


मराठ्यांच्या भीतीने हाय खाऊन 31 ऑक्टोबर 1770 रोजी नजीबखान मरण पावला. नजीबखानाचा मुलगा झाबेदाखान याने दिल्लीचा ताबा घेतला होता. मराठ्यांच्या फौजा दिल्लीजवळ पोहोचल्या. 7  फेब्रुवारी 1771 रोजी महादजी शिंदे यांनी दिल्ली शहर जिंकून घेतले व दिल्लीच्या लाल किल्ल्याला वेढा दिला. झाबेदाखान व कासीम अलिखान याने काही काळ प्रतिकार केला; पण मराठ्यांच्या हल्ल्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि मराठ्यांनी त्यांना कैद केले. 10 फेब्रुवारी 1771 रोजी मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून पुन्हा एकदा शिवरायांचा भगवा दिल्लीवर फडकावला. हे वर्तमान समजताच इंग्रजांनी मराठ्यांशी शत्रूत्व नको म्हणून शाह आलमची सुटका करून त्याची दिल्लीकडे रवानगी केली. शाह आलम दिल्लीत येताच महादजी त्याला आपल्याबरोबर घेऊन पानिपतचा बदला घेण्यास निघाला.



शाह आलम बादशहाने महादजी शिंदे यांच्या महत्कार्याबद्दल त्यांना आपल्या मुतालिकीची सनद देऊन दिल्लीचा कारभार त्यांच्यावर सोपविला. महादजींनी 1771 पासून 1794 सालापर्यंत म्हणजेच निधनापर्यंत दिल्लीचा कारभार करून लाल किल्ल्याचे रक्षण केले. त्याहीनंतर 1803 मध्ये दिल्ली जिंकणाऱ्या इंग्रज सेनापती जनरल लेक याने आपल्या दिल्ली विजयाच्या इतिहासात लिहून ठेवले आहे की, दिल्ली आम्ही मुघलांशी नव्हे, तर मराठ्यांशी लढून जिंकली. 


मराठ्यांनी पानिपत, सोनपत, बागपत, कुंजपुरा, शामली, फत्तरगड, घोसगड आणि नजिबाबाद जिंकून घेतले. नजीबखानाने पानिपतमध्ये लुटलेली तीस लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी पुन्हा मिळवली. शेकडो मराठा स्त्रियांना त्याच्या कैदेतून मुक्त केले. नजीबखानाची कबर उखडून गंगेत मिसळून मराठ्यांनी पानिपतचा पुरता बदला घेतला. ही बातमी ज्या वेळेस अब्दालीला समजली असेल त्या वेळेस तो किती संतापला असेल? परंतु त्याची पुन्हा हिंदुस्थानात येण्याची हिंमत झाली नाही. लवकरच 14 एप्रिल 1772 रोजी तो काबूलमध्ये मृत्यू पावला.


एकंदरीतच, पानिपतनंतर बरोबर दहा वर्षातच मराठे पुन्हा उत्तरेत स्थिरावले. इतकंच नव्हे तर दिल्ली पुन्हा आपल्या छत्राखाली आणून बादशहाला आपल्या उपकारात पुन्हा तख्त बहाल केलं. पुढे आणखी सहा महिन्यात फौजा नजिबाच्या पथ्थरगडावर चालून गेल्या आणि नजिबाची राजधानी उध्वस्त केली. 10 फेब्रुवारी हा दिवस मात्र इतिहासात पानिपतचा प्रतिशोध घेण्याचा उद्देश सफल झाला म्हणून कायमच ठळक अक्षरात नोंदवला गेला.