लखनौ : नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. काल (20 डिसेंबर) उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशसह देशातल्या इतर राज्यातही आंदोलनाला हळूहळू हिंसक वळण मिळताना दिसत आहे. तर मंगळुरुत झालेल्या हिंसक आंदोलनात 2 जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान काल महाराष्ट्रातही जवळपास 15 हून अधिक जिल्ह्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला होता.


दरम्यान, कालच्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशातल्या 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यामध्ये लखनौ, प्रयागराज, अलीगड, आग्रा, मेरठ, आजमगढ यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


परवा (19 डिसेंबर) नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात सयंमानं आंदोलनं झाली. मात्र काल अनेक ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केल्याचे पाहायला मिळाले. काल हिंगोलीपासून हिंसक आंदोलनांना सुरुवात झाली. सकाळी जमावाने हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यात बसची तोडफोड केली. या हिंसक आंदोलनाचं लोण बीड आणि परभणीतही पोहोचलं आहे. बीडमध्ये जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. तर परभणीमध्ये अग्निशमन दलाच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले.


पश्चिम बंगालमध्ये कायद्याविरोधात रॅली
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काल पुन्हा एकदा कोलकात्यात मोठी रॅली काढणार आहेत. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निगराणीखाली जनमत जमवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आव्हानही ममता बॅनर्जींनी मोदींना दिलं आहे.


टीएमसीची बैठक
शुक्रवारी जयपुरमध्ये भाजपकडून NRC आणि CAA च्या समर्थनार्थ भव्य रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता शहीद स्मारक, गव्हर्न्मेंट हॉस्टेलपासून रॅली सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. बंगालमध्ये NRC आणि CAA कायदा लागू करण्यासाठी सक्तीने विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी टीएमसी नेते आणि आमदारांना बैठकीत सहभागी होण्यास सांगितले आहे.


अलीगड मुस्लीम विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही सुरक्षारक्षकही जखमीही झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सर्व रस्ते बंद केले होते. विद्यापीठातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन वातावरण शांत होईपर्यंत विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉस्टेल्सही खाली करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्राध्यापक अफीफ उल्लाह खान यांनी दिली.


दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशभरात जामियातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याची माहिती मिळत आहे. तसेच काल (गुरुवारी) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, कर्नाटकातील मंगळूरू, गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईसह देशातील इतर अनेक शहरांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं करण्यात आली.