लखनौ: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारात सुबोध कुमार सिंह या पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या हत्येच्या कटात विहिंप, बजरंग दल आणि भाजयुमोच्या सदस्यांचा समावेश असल्याचं उघड झालं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुबोध कुमार सिंह हे दादरी हिंसाचाराचे तपास अधिकारीही होते. सध्या या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.


बुलंदशहरात हिंसाचार भडकवण्याचा कट रचणाऱ्यांची धरपकड सुरु झाली आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या छाप्यात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून 75 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या हिंसाचाराच्या सूत्रधाराचं नावंही समोर आलं आहे. योगश राज असं त्याचं नाव असून तो बजरंग दलाचा संयोजक आहे. उपस्थित लोकांना भडकवण्याचा आरोप त्याच्यावर आहे.

सुबोध सिंह यांच्या हत्येच्या कटात योगेश राज (जिल्हा अध्यक्ष, प्रवीण तोगडिया ग्रुप), उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल (माजी अध्यक्ष, भाजयुमो) यांची नावं समोर आली आहे. देवेंद्र, चमन आणि आशिष चौहान अशी अटक केलेल्यांची नावं आहे.

जमावाची पोलीस स्टेशनवर धडक
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्येही योगेश राजचं नाव आहे. एफआयआरनुसार, योगेश राजने त्याच्या साथीदारांच्या मदतीने जमावाला भडकवलं. सोमवारी दुपारी 1.15 च्या सुमारास जेव्हा संतप्त जमाव पोलीस चौकीबाहेर पोहोचला त्यावर सुबोध सिंह यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु शस्त्रांसह पोहोचलेला जमाव शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी काही जणांना पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची पिस्तूल, मोबाईल फोन हिसकावला. शिवाय वायरलेस सेटही तोडला.



कुटुंबाला आर्थिक मदत
या हिंसाचारात शहीद झालेल्या सुधोब कुमार यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शिवाय त्यांच्या मनात संतापही आहे. सुबोध कुमार यांना पोलीस लाईनमध्ये अखेरची सलामी देण्यात आली. यानंतर त्यांचं पार्थिव मूळगावी जनपद एटामध्ये आणण्यात आलं. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुलंदशहरातील हिंसाचारावर दु:ख व्यक्त करत पोलीन निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या पत्नीला 40 लाख रुपये आणि आई-वडिलांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात सोमवारी एका शेतात कथित गोहत्या झाली असून एका विशिष्ट समाजातील लोकांनी गोहत्या केली आहे, अशी अफवा पसरली होती. अफवा पसरल्यानंतर लोकांनी गोवंशाचे अवशेष घेऊन रस्ता अडवला. पाहता पाहता गर्दी वाढली. शेकडो लोक विरोध-आंदोलन करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जमाव आणखीच भडकला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे जमावाचा क्षोभ आणखीच वाढला. थोड्याच वेळात तिथे गोळीबार झाला. यात सुबोध कुमार आणि आणखी एक तरुणी जखमी झाला. सुबोध कुमार यांना रुग्णालयात नेण्यासही जमावाने रोखलं. शिवाय त्यांच्या कारवर तुफान दगडफेकही केली. सुबोध कुमार यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ज्यात 27 ज्ञात आणि 50-60 अज्ञात लोकांच्या नावाचा समावेश आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 147, 148, 149, 307, 302, 333, 353, 427, 436, 394 आणि 7 गुन्हेगारी सुधारणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवाय या प्रकरणाच्या तपासासाठी मेरठ झोच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.