नवी दिल्ली: राष्ट्रपती निवडणुकीसाठी आता अवघे काही आठवडे उरले असताना, भाजपने सहमतीचा उमेदवार देण्याबाबत चाचपणी करायला सुरुवात केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. केंद्रातल्या तीन वरिष्ठ मंत्र्यांचा यात समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचा या समितीत समावेश आहे.

राष्ट्रपतीपदाबाबत सहमतीचा उमेदवार निवडण्यासाठी विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ एनडीएच नव्हे, तर इतर विरोधी पक्षांशीही चर्चा ही समिती करणार आहे.

आज सकाळपासूनच राजधानी दिल्लीत राष्ट्रपतीपदावरुन हालचाली सुरु झाल्या. अमित शहांनी आपला नियोजित अरुणाचल दौरा रद्द करुन, आधी या समितीच्या स्थापनेसाठी बैठक घेतली.

बुधवारी यूपीएच्या अनेक घटकपक्षांशी राष्ट्रपती निवडणुकीबाबत बैठक होणार आहे. त्याआधी अमित शहांनी नेमलेली ही समिती नेमकी कशी रणनीती आखते, हे पाहणं महत्वाचं असेल.

28 जून ही राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. एनडीए सहमतीचा उमेदवार देण्यात अपयशी ठरली, तरच विरोधक राष्ट्रपती निवडणुकीत आपला उमेदवार दाखल करतील असं विधान नुकतंच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी दाखल केलेलं होतं. हे विधान एनडीएच्या पथ्यावरच पडणार आहे. पण जरी लढाईची वेळ आली तरी आकड्यांच्या गणितात एनडीएच मजबूत असून, आमचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत.