मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपने (BJP) दादरा नगर हवेली आणि दमणचे प्रदेश प्रभारी म्हणून पूर्णेश मोदी यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, दुष्यंत पटेल यांची राज्य सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


पूर्णेश मोदी  तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पूर्णेश मोदी हे ओबीसी समाजाचे नेते असून पेशाने ते वकिल देखील आहेत. 2013 मध्ये सुरत पश्चिम मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2017 आणि 2022 मध्ये ते याच जागेवरून निवडून आले. गेल्या वेळी ते एक लाख मतांच्या फरकाने विजयी झाले होते. 
2021 मध्ये, त्यांना पहिल्या भूपेंद्र पटेल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आणि त्यांना वाहतूक, नागरी विमान वाहतूक, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास यासारखे खाते देण्यात आले.


राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला


भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांच्या मानहानीचा आरोप केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांना सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मार्च महिन्यात निकाल देताना राहुल यांना दोषी ठरवले.  त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती. 13 एप्रिल 2019 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकात राहुल गांधी यांनी भाषण करताना मोदी आडनावाबाबत भाष्य केले होते. 'सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?' असे राहुल गांधी म्हणाले होते.   यावरुन भाजपचे नेते पूर्नेश मोदी यांनी सुरत कोर्टात त्यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.


सर्वोच्च न्यायालयाने दिला राहुल गांधींना दिलासा


या प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळाली. 4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेवर स्थगिती दिली. सत्र न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असतानाच गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनीही निर्णयात जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्याची कारणे द्यायला हवी होती.


हेही वाचा : 


Rahul Gandhi : लोक मरत होते आणि पंतप्रधान मोदी थाळी वाजवण्यास सांगत होते; राहुल गांधींची टीका