नवी दिल्ली : येत्या 18 डिसेंबरला गुजरातची सत्ता कोण मिळवणार हे समजणार आहे. मात्र, त्याआधी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीनुसार गुजरातमध्ये कमळच फुलणार असल्याचं दिसतं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-लोकनीति-सीएसडीएस आणि व्हीएमआर-टाइम्स नाऊनं केलेल्या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




गुजरात निवडणुकीआधी व्हीएमआर-टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये भाजपला 118-134 जागा मिळतील. तर काँग्रेसला 49 ते 61 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरांना 3 जागा मिळतील.

मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपला 52 टक्के, काँग्रेसला 37 टक्के आणि इतरांना 11 टक्के मतदान मिळू शकतं.



या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये भाजपविरोधात कोणतीही लाट पाहायला मिळत नाही. तसेच 2012तील निवडणुकीपेक्षा भाजपच्या जागा या निवडणुकीत वाढण्याची शक्यता आहे. 2012मध्ये भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या. तर आता 118 ते 134 जागा मिळण्याची शक्यता आहे.

एबीपी न्यूज-लोकनीति-सीएसडीएस सर्व्हे :

एबीपी न्यूज-लोकनीति-सीएसडीएस-लोकनीति-सीएसडीएसनं 9 ऑगस्ट 2017 ते 16 ऑगस्ट 2017 मध्ये एक सर्व्हे केला होता. हा सर्व्हे गुजरातमधील 50 विधानसभा मतदार संघात करण्यात आला होता. ज्यामध्ये 4090 लोकांची मतं विचारात घेतली गेली. या सर्व्हेत देखील भाजपच बाजी मारणार असल्याचं समोर आलं आहे.  या जनमत चाचणीमध्ये भाजपला 144 ते 152 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला 26 ते 32 जागा आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



या सर्व्हेनुसार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी विजय रुपाणी यांना 24 टक्के पसंती असून नरेंद्र मोदींना 7 टक्के तर आनंदीबेन पटेल यांना 5 टक्के पसंती मिळाली आहे. तर फक्त 2 टक्के लोकांना वाटतं की, भरतसिंह सोळंकी हे गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत.



गुजरात विधानसभेसाठी 2012 मध्ये 182 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपने 115, काँग्रेस 61 आणि अन्य 6 जागा जिंकल्या होत्या.

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. गेल्या तीन वर्षात मोदी-शाह जोडीनं अवघा भारत भाजपमय केला आहे. मात्र, आता त्यांना त्यांचा गड राखण्याचं आव्हान आहे. दलित ओबीसी नेते अल्पेश ठाकोर आणि पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे दोघेही काँग्रेसच्या बाजूनं गेल्यानं मोदी-शाहंना आव्हान निर्माण झालं आहे.