अहमदाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच मुलगा जय शाह यांच्या कंपनीवरील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. एका न्यूज चॅनलशी बोलताना अमित शाह म्हणाले की, "जय यांच्या कंपनीने सरकारसोबत कोणताही व्यवहार केला नाही. कोणतीही सरकारी जमीन घेतलेली नाही आणि कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. हे भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही. जर काँग्रेसकडे या प्रकरणी पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टात सादर करावेत."


उलट यावेळी अमित शाहांनी काँग्रेसवर निशाणा साधला. "स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात काँग्रेसवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. या प्रकरणात त्यांनी कधी अब्रूनुकसानीचा दावा केला का?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

पुरावे असतील तर समोर यावं : शाह
"माझ्या मुलाने कोर्टात जाऊन 100 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणीही केली आहे. आमच्यावर आरोप झाले तर आम्ही 100 कोटींच्या मानहानीची केस दाखल केली. काँग्रेसवर एवढे आरोप लागले, त्यांनी किती जणांवर केस केली? जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर समोर यावं," असं आव्हान अमित शाह यांनी दिलं आहे.

टर्नओव्हर आणि फायद्यात फरक
या संपूर्ण प्रकरणात विस्ताराने उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, "जयच्या कंपनीचा कमोडिटीज एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. 80 कोटींचा टर्नओव्हर झाला हे सांगत आहेत, पण फायदा किती झाला हे कोणीच सांगत नाही. पण टर्नओव्हर आणि फायदा यात फरत असतो, हे लक्षात घ्यायला हवं. 80 कोटींच्या टर्नओव्हरनंतर 1.5 कोटींचं नुकसानही झालं. तर पैशांची अफरातफर कशी झाली? सगळे व्यवहार बँक आणि चेकच्या माध्यमातून झाले. तसंच सगळे व्यवहार एक्सपोर्टचे आहेत. म्हणून कंपनीचा टर्नओवर जास्त आहे."

अमित शाहांनी यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस घेरलं. "काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. अनेक नेत्यांविरोधात कोर्टात प्रकरणं सुरु आहे. तरीही काँग्रेस या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी भाजपवर चुकीचे आरोप लावत आहे," असंही शाह म्हणाले.

अमित शाहांवर आरोप काय?
'द वायर' या वेबसाईटच्या वृत्तानुसार, 2004 मध्ये अमित शाह यांचा मुलगा जय शाहने टेंपल इन्टरप्रायझेज नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह व्यवस्थापक बनल्या. 2013 पर्यंत कंपनीने विशेष कमाई केली नाही. पण केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर कंपनीचा टर्नओव्हर 80 कोटी रुपये झाला. एक वर्षात जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16,000 टक्के वाढला.