नवी दिल्ली : भारतात उपासमारी ही एक गंभीर समस्या आहे. खायला अन्न नसल्यामुळे अनेक जण पाणी पिऊन दिवस काढतात. त्यातच आता सर्वाधिक उपासमारी असलेल्या 119 देशांच्या यादीत भारताची तीन अंकांनी घसरण झाल्याने चिंता आणखी वाढली आहे.


ग्लोबल हंगर इंडेक्सच्या अहवालात, गेल्या वर्षी भारताचा 97 वा क्रमांक होता. मात्र यावर्षीच्या अहवालात भारत 100 व्या स्थानावार आहे. भारतात कुपोषणाचा स्तर वाढला आहे. त्यामुळे उपासमारीची समस्या गंभीर बनली आहे, ज्यासाठी सामाजिक क्षेत्राने पुढाकार घेण्याची गरज असल्याचं आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने म्हटलं आहे.

उत्तर कोरिया, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमार या देशांपेक्षाही भारतात जास्त उपासमारी आहे. दरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या यादीत अनुक्रमे 106 व्या आणि 107 व्या क्रमांकावर आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे आशिया खंडात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानंतर भारतामध्ये सर्वाधिक उपासमारी आहे. या रँकिंगमध्ये चीन 29, नेपाळ 72, म्यानमार 77, श्रीलंका 84 आणि बांगलादेश 88 व्या स्थानावर आहे. तर भारतासारखा सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेला देश उपासमारीच्या बाबतीत 100 व्या क्रमांकावर आहे.