नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा मिनरल वॉटर ब्रॅण्ड बिस्लेरी प्रजासत्ताक दिनाला आपल्या नव्या अभियानासह तयार आहे. बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड 'वन नेशन वन वॉटर' हे नवं अभियान राबवत आहे. भारताच्या विविधतेतून एकतेचा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे.


काही दिवसांपूर्वीच बिस्लेरीने आपले लेबल मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषमांमध्ये बदलले आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणून 'वन नेशन वन वॉटर' अभियान राबवलं जात आहे. बिस्लेरी आता तुमच्या भाषेत, हाच या अभियानाचा संदेश आहे.



आपल्या नव्या अभियानाबाबद बोलताना बिस्लेरीच्या संचालक (मार्केटिं अँड बिझनेस) अंजना घोष म्हणाल्या की, 'भारत हा अनेक भाषांचा देश आहे. इथे अनेक भाषा बोलल्या जातात. स्वाभाविकपणे लोकांना आपल्या मातृभाषेत बोलायला आवडतं. 'वन नेशन वन वॉटर'द्वारे आम्हाला लोकांना त्यांच्या भाषेशी जोडायचं आहे. त्यामुळे लेबल प्रादेशिक भाषेत असतील. प्रादेशिक भाषेतील लेबल लोकांना भावुक करतात आणि ग्राहकही त्याच्याशी जोडले जातात.

भारतात बाटली बंद पाण्याच्या उद्योगाची सुरुवात 90च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. 2020 पर्यंत हा उद्योग भारतात 22.3% च्या वेगाने वाढेल. स्वदेशी कंपनी बिस्लेरीचं बाजारातील 40 टक्के भागावर वर्चस्व आहे. तर कोका कोला इंडियाचा ब्रॅण्ड किन्ले, पेप्सिको इंडियाच्या अॅक्वाफिनाशिवाय अनेक भारतीय कंपन्याही बाटलीबंद पाण्याच्या उद्योगात जागा मिळवत आहेत.