Subhash Chandra Bose Jayanti इंग्रजांविरोधातील भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाबाबतचा इतिहास आठवताना एक नाव न विसरता घेतलं जातं. ते नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. 'तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा' असा नारा देत देशप्रेमासाठी स्वत:ला झोकून दिलेल्या नेताजींनी देशातील तरुणाईमध्ये देशप्रेमाची भावना अशी काही जागृत केली की, पाहता पाहता सबंध तरुणाई एकाच ध्येय्यानं व्यापली.
सर्वात मोठा अपराध म्हणजे अन्याय सहन करणं आणि चुकीच्या गोष्टींशी तडजोड करणं, अधी धारणा असणाऱ्या नेताजींचा हा कायम समज होता, की यशाचा पायाच मुळात अपयश असतो. आजच्याच दिवशी 1897 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला होता. ओडिशातील कटक येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील एक प्रख्यात वकील होते. जालियनवाला बाग हत्याकांड या एका घटनेमुळं बोस यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पडली होती.


कोलकात्यातील प्रेसिडेंसी कॉलेज आणि स्कॉटीश चर्च कॉलेज इथं बोस यांचं शिक्षण झालं होतं. ज्यानंतर ते प्रशासकीय सेवेच्या तयारीसाठी इंग्लंडला गेले. 1920 मध्ये त्यांना यात यश मिळालं. पण, देशभक्तीसाठी झोकून देऊ इच्छिणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांनी फार काळ ही नोकरी केली नाही. सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ते भारतात परतले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले गेले. पण, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. त्यामुळं जहाल क्रांतीकारक गटात त्यांची लोकप्रियता वाढली. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात मतांतरं असली तरीही त्या दोघांच्याही मनात एकमेकांबाबत कमालीचा आदर होता.


1938 मध्ये बोस यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं आणि राष्ट्रीय योजना एकवटली. गांधीजींचा बोस यांच्या तत्त्वांना विरोध होताच. त्यामुळं आपल्याला गांधीजींचा होत असणारा विरोध पाहता बोस यांनी स्वत: काँग्रेसमधून काढता पाय घेतला.


दरम्यानच्या काळात दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. ब्रिटनच्या विरोधकांशी हातमिळवणी केल्यास इंग्रज राजवटीतून भारताला मुक्त करता येऊ शकतं, असा बोस यांचा विचार होता. त्यांच्या चा विचारसरणीवर इंग्रजांना संशय होताच. म्हणूनच त्यांनी ब्रिटीश सरकारनं नेताजींना कोलकात्यामध्ये नजरकैदेत ठेवलं. पण, तिथून पळ काढण्यात ते यशस्वी ठरले. ज्यानंतर ते जर्मनीला पोहोचले.


काही काळ ते युरोपात राहिले. हा काळ हिटलरच्या नाझीवादाचा आणि मुसोलिनीच्या फासीवादाचा होता. या दोघांच्याही निशाण्यावर होतं इंग्लंड. त्यामुळं शत्रूचा शत्रू आपला भविष्यातील मित्र असं सोपं गणित बोस यांनी विचारात आणलं. याचदरम्यान त्यांची भेट हिटलरशी झाली.


हिटलरवरही नेताजींची भुरळ


स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न सुरु असतानाच नेताजींनी एकदा हिटलरची भेट घेतली होती. त्यावेळचा एक रंजक किस्सा आहे. ज्यावेळी ते हिटलरच्या भेटीसाठी गेले होते तेव्हा त्यांना एका खोलीत बसवण्यात आलं. दुसरं महायुद्ध सुरु असल्यामुळं त्यावेळी हिटलरच्या जीवाला धोका होता. त्यामुळं स्वत:च्या बचावासाठी त्यानं सोबत 'बॉडी डबल' अर्थात आपल्यासारखीच हुबेहुब दिसणारी माणसं ठेवण्यास सुरुवात केली होती.
काही वेळानंच ज्यावेळी हिटलरसारखाच दिसणारा एक व्यक्ती नेताजींच्या भेटीसाठी आला आणि त्यानं हस्तांदोलन करण्यासाठी नेताजींकडे हात पुढे केला. त्यांनी हात मिळवला, पण मिश्किलपणे हसत म्हणाले, तुम्ही हिटलर नाही आहात; मी त्यांना भेटायला आलो आहे. तो व्यक्ती थबकला आणि तेथून निघून गेला. थोड्या वेळानं आणखी एक व्यक्ती आता, हिटलरसारखाच दिसणारा तेव्हाही नेताजींनी स्पष्ट सांगितलं की, ते हिटलरच्या भेटीसाठी आले आहेत. त्यांच्या बॉडी डबलसाठी नव्हे.


ज्यानंतर अखेर खुद्द हिटलर त्यांच्या भेटीसाठी आला. यावेळी त्या खऱ्याखुऱ्या हिटलरला नेताजींनी ओळखलं, ते म्हणाले ''मी सुभाष आहे. भारतातून आलो आहे. तुम्ही हात मिळवण्याआधी कृपया हातमोजे काढा कारण मैत्रीमध्ये मला कोणतंही अंतर नको आहे''. त्यावेळी नेताजींचा आत्मविश्वास पाहून हिटलरलाही त्यांची भुरळ पडली. त्यानं लगेचच नेताजींनी खोट्या हिटलरला कसं ओळखलं असा प्रश्न त्यांना केला. तेव्हा नेताजी म्हणाले, 'त्या दोघांनीही अभिवादनासाठी पहिला हात पुढं केला. असं तर पाहुणे करतात'. नेताजींचं हे बुद्धिचातुर्य हिटलरवर भलताच प्रभाव टाकून गेलं.


आझाद हिंद सेना


भारताबाहेर राहून नेताजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाचं योगदान दिलं. आझाद हिंद सेनेची यात महत्त्वपूर्ण भूमिका होती. 1942 मध्ये या सेनेची स्थापना झाली होती. रास बिहारी बोस आणि मोहन सिंह यांनी दुसऱ्या विश्वयुद्धाच्या दरम्यान या सेनेची स्थापना करण्यात आली होती. ज्यानंतर या दोघांमध्येही मतभेद झाले. नेताजी जर्मनीमध्ये वास्तव्यास होते, त्यावेळी जपानमध्ये राहणाऱ्या आझाद हिंद सेनेचे संस्थापक रास बिहारी बोस यांमी त्यांना आमंत्रित केलं आणि 1943 मध्ये त्यांनी नेताजींवर या सेनेची धुरा सोपवली. त्यावेळी आझाद हिंद सेनेत 85 हजार सैनिक सहभागी होते. शिवाय कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या नेतृत्त्वाअंतर्गत एक महिला तुकडीही या सेनेचा एक भाग होती. पुढं नेताजींनी या सेनेला एक नवसंदीवनी दिली आणि इतिहासात अजरामर कामगिरीची नोंद झाली.