नवी दिल्ली : मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. कारण जानेवारीपासून देशभरातील सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून याची जोरदार तयारी सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा विचार सुरु होता. या प्रणालीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक ओळखपत्र दिलं जाईल. ज्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती असेल.

बायोमेट्रिक मशीनसमोर कर्मचाऱ्यांनी आपलं कार्ड धरलं किंवा स्वाईप केलं तर त्याची उपस्थिती नोंद केली जाईल. तर काही मशीनसाठी कर्मचाऱ्यांना त्यांना आपलं थम्ब इम्प्रेशनही द्यावं लागेल. या अटेंडेसच्या आधारेच कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार दिला जाईल.

सध्या ही व्यवस्था रेल्वेमधील रेल्वे बोर्ड, विभागीय मुख्यालये आणि काही मोजक्या कार्यालयात सुरु आहे. पण आता रेल्वेच्या सर्व विभागात ही प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जानेवारी 2018 पर्यंत ही प्रणाली रेल्वेच्या सर्व विभागात कार्यन्वित होईल.

या पूर्वीदेखील अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यावर अंमलबजावणी झाली नव्हती. पण आता मोदी सरकारने 31 जानेवारी 2018 पर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून हालचाली सुरु केल्या आहेत.

ही प्रणाली लागू झाल्यास कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं वेळेवर कामावर न येणं, कामकाजाची वेळ संपण्या आधीच निघून जाणं यासारख्या प्रकारांना आळा घालणं शक्य होईल. तसेच गैर हजर राहण्याच्या प्रकारांना आळा घालण्यात यश येतील, असा दावा करण्यात आहे.

रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वातआधी ही सुविधा सर्व विभागीय कार्यालये, आरजीएसओ, कोलकाता मेट्रो, रेल्वे वर्कशॉप, फॅक्ट्री आणि उत्पादन युनिटमध्ये या महिन्याच्या 30 नोव्हेंबरमध्ये लागू केलं जाणार आहे.

दरम्यान, रेल्वेने आपल्या एक्स्प्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात नुकताच बदल केला आहे. यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. रेल्वे रुळांची देखभाल वेळोवेळी करणं शक्य व्हावं, यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत होतं. या वेळापत्रक बदलाने जवळपास एक डझनहून जास्त एक्स्प्रेस गाड्यांची गतीही वाढवण्यात आली आहे.