Bihar Politics : बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजकीय भूंकप घडवत भाजपला धक्का दिला. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलासबोत (RJD) सत्ता स्थापन केली. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता या महागठबंधनच्या सरकारसमोर सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचं आवाहन आहे. येत्या 24 आणि 25 ऑगस्टला विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. यामध्ये नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यादृष्टीनं तयारी सुरु केली आहे.


बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर येत्या 24 आणि 25 ऑगस्टला विधीमंडळाचे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यामध्ये सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. तसेच या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. 24 ऑगस्टला विधानसभेची निवड होणार आहे, तर 25 ऑगस्टला विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. दरम्यान, बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलचा (RJD) अध्यक्ष असणार आहे. तर विधान परिषदेत जनता दलाचा (JDU) अध्यक्ष असणार आहे. विधानसभेत अवध बिहारी चौधरी (यादव) यांचे नाव अध्यक्षासाठी निश्चित करण्यात आलं आहे, तर देवेशचंद्र ठाकूर (ब्राह्मण) विधानपरिषदेचे अध्यक्ष असणार आहेत.


भाजपशी काडीमोड घेत नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले


दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ​​राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सोबत सरकार स्थापन केले. बिहारमधील या राजकीय बदलाची देशभर चर्चा सुरु आहे. नितीश कुमार यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या आरजेडीशी हातमिळवणी केली. नितीश कुमार यांच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी नितीश कुमार यांच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. नितीश कुमार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अशीही चर्चा होती की 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय किंवा कोणतीही ठोस चर्चा विरोधी पक्षांमध्ये होताना दिसत नाही.


 नितीश कुमार यांचे 2024 वर लक्ष?


दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधकांकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात जनता दल (युनायटेड) पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, इतर पक्षांना हवे असल्यास नितीश कुमार पर्याय असू शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यावर नितीश कुमार यांचे मुख्य लक्ष असल्याचे जेडीयूचे अध्यक्ष लालन सिंह यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: