Bihar New Government : बिहारमध्ये आज नितीशकुमार (Nitish Kumar) मुख्यमंत्रीपदाची तर राजद नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार आज आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनणार आहेत. यापूर्वी हिंदुस्थान अवाम मोर्चाचे नेते जीतन राम मांझी यांनी आपल्या पक्षातून दोन जणांना मंत्रिपद देण्याची मागणी केली होती. आज नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांचा शपथविधी होणार असला तरी, बिहारच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र होणार नसल्याची माहिती मिळत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर काही दिवसांनी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शपथविधीला कोणत्याही मोठ्या चेहऱ्याला आमंत्रित करण्यात आलेलं नाही. आरजेडी नेते लालू प्रसाद यादव प्रकृती अस्वास्थामुळं दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते शपथविधीला उपस्थित राहू शकणार नाहीत, तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही शपथविधीला हजर राहणार नाहीत.


हिंदुस्थान अवाम मोर्चाचे नेते जीतन राम मांझी यांनी शपथविधीपूर्वीच नितीशकुमार यांच्यासमोर दोन मंत्रिपदांची अट ठेवली आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार आजच करावा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. आज 60-70 मंत्र्यांना शपथ द्यावी, कारण खरमास सुरू होणार असल्याचं जितन राम मांझी यांनी म्हटलं आहे. जितन राम मांझी यांनी स्पष्ट केलेल्या खरमास हिंदू धर्मात मलमास असंही म्हणतात, असं मानलं जातं की, या काळात शुभ कार्य करणं शक्यतो टाळलं जातं. 


भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला


नितीश कुमार यांनी सोमवारी भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. नितीश कुमार यांनी भाजपवर जेडीयूचा अपमान करत स्वत:च्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. यानंतर महागठबंधनची बैठक झाली. ज्यामध्ये नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महागठबंधनच्या बैठकीत काँग्रेस (Congress)  आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते.


भाजप-जेडीयूची युती तुटली, महागठबंधनचं सरकार 


बैठकीनंतर नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव राजभवनात पोहोचले आणि त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांना 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ABP-C Voter Survey : नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात मुख्यमंत्री कोण? बिहारच्या जनतेचा कौल कुणाला?