पाटणा : बिहारमध्ये साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन चार कामगारांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत नऊ कामगार जखमी असून काही जण आत अडकल्याची भीती आहे.


बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील चौकोर भागात असलेल्या सासमुसा साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला. ओव्हरहीटींगमुळे बॉयलरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

बॉयलरचा स्फोट झाला त्यावेळी जवळपास 100 कामगार ड्यूटीवर होते. बॉयलर पाईपमध्ये स्फोट झाल्यानंतर धावपळ उडाल्याचा दावा एका मृताच्या नातेवाईकाने केला आहे.

आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली काही जण गाडले गेल्याची शंका असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.