पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांवर मतदान पार पडलं. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी वाढलेलं मतदान लक्षात घेता मोठा दावा केला आहे. प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी झालेलं अधिक मतदान हे दाखवतं की जनतेला बदल हवा आहे. नवी व्यवस्था येत आहे. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीवेळी पहिल्या टप्प्यात 121 जागांवर 55.81 टक्के मतदान झालं होतं. यावेळी सायंकाळी 5 वाजता मतदानाची आकडेवारी 60.13 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर, नव्या माहितीनुसार बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 64.46 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी महिलांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. प्रशांत किशोर यांचा पक्ष यावेळी पूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांच्या पक्षाला किती जागांवर विजय मिळतो ते पाहावं लागेल.
महागठबंधनचे नेते काय म्हणाले?
दुसरीकडे महागठबंधनच्या नेत्यांनी या वाढलेल्या मतदानासंदर्भात वेगवेगळे दावे केले आहेत. भाकप (मार्क्सवादी) चे महासचिव एमए बेबी यांनी गुरुवारी म्हटलं की महागठबंधनच्या प्रचाराला बिहारच्या लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. तरुण नफरत आणि द्वेषाच्या राजकारणाला स्वीकारणार नाहीत, असं ते म्हणाले.
सीपीआयचे महासचिव एमए बेबी यांनी म्हटलं की महागठबंधननं लोकांच्या कल्याणाचे, उपजिविकेचे मुद्दे मांडले आहेत. बेबी म्हणाले की, महागठबंधनच्या प्रचाराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही लोकांच्या कल्याण आणि उपजिविकेच्या मुद्यांना समोर आणण्यात यशस्वी ठरलो आहेत, असंही ते म्हणाले.
बिहारमध्ये बदल होणार : मुकेश साहनी
विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पाहून बिहारमध्ये बदलाची लाट असल्याचं म्हटलं. बंपर मतदान झालं आहे, अशी माहिती मिळाली आहे. आता पूर्ण बिहारमध्ये बदल होईल आणि महागठबंधनचं सरकार बनेल, अशी आशा असल्याचं मुकेश साहनी म्हणाले.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा पक्ष 150 पेक्षा अधिक जागा जिंकेल किंवा 10 पेक्षा कमी जागा जिंकेल असं वक्तव्य केलं होतं. याशिवाय किशोर यांनी बिहारला तिसरा पर्याय हवा आहे, असंही म्हटलं. बिहार विधानसभेच्या राहिलेल्या 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होईल. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे. बिहारचे मतदार यावेळी कोणत्या आघाडीला सत्तेत बसवणार हे पाहावं लागेल.