Supriya Sule on Parth Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार पुण्यातील उच्चभ्रू कोरेगावमधील महार वतनाच्या जमिनीवरून चांगलेच अडचणीत आले आहेत. महार वतनाची असलेली तब्बल 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये डल्ला मारल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर होत आहे. या आरोपानंतर आता राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुद्धा अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भात चौकशी आदेश दिले आहेत. तहसीलदारांना तत्काळ प्रभावाने निलंबन करण्यात आलं आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यांनी नो कमेंट्स म्हणत माध्यमांपासून काढता पाय घेतला. दुसरीकडे आता आत्या सुप्रिया सुळे यांनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपला पार्थवर विश्वास असून तो चुकीचा काही करणार नाही, असं म्हटलं आहे.
माझा पार्थवर विश्वास, तो चुकीची गोष्ट करणार नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा पार्थवर विश्वास असून तो चुकीची गोष्ट करणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, मी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. तहसिलदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. हे बनाना रिपब्लिक असल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, सरकार म्हणत आमची जमीन विकता येत नाही. तहसीलदार म्हणतात मी सही केली नाही. त्यामुळे नोंदणी झाली की नाही? नेमकं सरकार कोण चालवतं? आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो. माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या. त्यांची पहिली टर्म चांगली होती, अच्छे को अच्छा बोलना चाहिए, पण आता मुख्यमंत्र्यांना झालंय काय? इतका गोंधळ का? अशी विचारणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या