दिल्ली : बॉलिवूडमधील बड्या निर्मात्यांनी सोमवारी रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ विरोधात दिल्ली हायकोर्ट धाव घेतली आहे. रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ यांनी फिल्म इंडस्ट्रीविरोधात "बेजबाबदार आणि अपमानास्पद टिप्पण्या" करणे किंवा प्रकाशित करण्यास मनाई करावी, अशी मागणी निर्मात्यांनी कोर्टात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सदस्यांना विविध विषयांवरील ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्याचे आवाहन केले आहे. आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, करण जोहर, अजय देवगन, अनिल कपूर, रोहित शेट्टी यांच्या मालकीच्या प्रॉडक्शन हाऊसचाही यामध्ये समावेश आहे.


चार चित्रपट उद्योग संघटनांनी आणि 34 निर्मात्यांनी दाखल केलेल्या खटल्यात उद्योग-संबंधित व्यक्तींना गोपनीयतेच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये रिपब्लिक टीव्ही, मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि पत्रकार प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर आणि समूह संपादक नविका कुमार आणि निनावी प्रतिवादी तसेच सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्म्सना बॉलिवूडविरूद्ध बेजबाबदार आणि अपमानास्पद टिप्पण्या करणे आणि प्रकाशित करण्यास मनाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे


डीएसके लॉ फर्ममार्फत दाखल करण्यात आलेल्या खटल्यात म्हटले आहे की, हे चॅनेल्स बॉलिवूडसाठी "गंदा", "मैला" "ड्रगी" सारख्या अत्यंत निंदनीय शब्दांचा वापर करत आहेत. यह बॉलीवुड है जहां गंदगी को साफ करने की जरूरत है’, ‘अरब के सभी इत्र बॉलीवुड की बदबू को दूर नहीं कर सकते हैं’, ‘यह देश का सबसे गंदा उद्योग है’, अशी वाक्य हे चॅनेल वापरत आहेत. '


ज्या मीडिया हाऊसेसनी दावा दाखल केला आहे त्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया (पीजीआय), सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सीआयएनटीए), इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर काउन्सिल (आयएफटीपीसी), स्क्रिन राइटर्स असोसिएशन (एसडब्ल्यूए), आमिर खान प्रोडक्शन्स, अ‍ॅड-लॅब फिल्म्स यांचा समावेश आहे. , अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क, अरबाज खान प्रॉडक्शन, आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन, बीएसके नेटवर्क अॅण्ड एंटरटेनमेंट, धर्मा प्रॉडक्शन, रॉय कपूर फिल्म्स, सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रोडक्शन्स, टायगर बेबी डिजिटल, विनोद चोप्रा फिल्म्स, विशाल भारद्वाज पिक्चर्स, यश राज फिल्म्स इत्यादींचा समावेश आहे.





या प्रकणावर अभिनेत्री कंगना रनौतने ट्वीट करत म्हटलं की, मी बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून शोषण आणि गुंडगिरीबद्दल तक्रारी करत आहे. ज्यामुळे एका कलाकाराचा मृत्यू झाला. जर सुशांतच्या मृत्यूमुळे बॉलिवूडची गटार साफ केली जात असेल तर मग इतका त्रास कशासाठी? माझ्याकडे असे घडण्याचे सर्व हिशेब आहेत. बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळलं आहे की जेव्हा संपूर्ण देशासमोर अनादर केला किंवा वेगळं पाडलं तर काय वाटतं. का लपून किंवा पळून जावं असं वाटतं? तुम्ही कळपात बरेच लांडगे आहात, एकट्याला वाटेलच की मरावं, नाही का?