बंगळुरु : भारतीय सैन्याचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल करीअप्पांना भारतरत्न देण्याची मागणी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केली आहे. आता करीअप्पांना भारतरत्न देण्याची वेळ आली आहे. जर इतर क्षेत्रातील सर्वांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळू शकतो, तर करीअप्पांना का नाही असा सवालही त्यांनी विचारला.


फील्ड मार्शल करीअप्पा म्हणजेच कोंडडेरा मडप्पा करिअप्पा यांनी 1947 साली भारत-पाक युद्धावेळी पश्चिमी सीमेवर भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं होतं. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही भारतीय सैन्याची कमान सांभाळणाऱ्या करीअप्पांचं 1993 मध्ये वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. मात्र त्यांनी देशाच्या सैन्यासाठी मोलाची कामगिरी बजावल्यानं त्यांचाही विचार भारतरत्नसाठी झाला पाहिजे असं लष्करप्रमुख बिपीन रावत म्हणाले.

करीअप्पा भारतीय सैन्याच्या त्या दोन अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांना फील्ड मार्शल पदवीनं सन्मानित करण्यात आलं. करीअप्पांव्यतिरिक्त केवळ फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना ही पदवी बहाल करण्यात आली होती. करीअप्पांना कीपर म्हणूनही संबोधलं जात होतं.

कोण आहेत फील्ड मार्शल करीअप्पा?

के एम करीअप्पांचा जन्म 28 जानेवारी 1899 साली कर्नाटकात झाला. त्यांचे पिता कोंडडेरा मडिकेरीमध्ये सरकारी अधिकारी होते.

करीअप्पांचं शालेय शिक्षण मडिकेरीमध्येच झालं. सुरुवातीपासूनच करीअप्पा अभ्यासात चांगले होते. गणित आणि चित्रकला त्यांचे आवडते विषय होते. मद्रास म्हणजेच आताच्या चेन्नईमधील प्रेसीडेन्सी कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं.

करिअप्पा यांनी 1947 साली भारत-पाक युद्धावेळी पश्चिमी सीमेवर भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं होतं.