बंगळुरु : सोशल मीडिया पोस्टमुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये हिंसाचार उसळला. आमदारांच्या भाच्याने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर हा हिंसाचार घडला. संतप्त जमावाने काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी फायरिंग केली असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका अॅडिश्नल कमिश्नरसह 60 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह्य पोस्ट लिहिल्यामुळे काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे.



श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळीत साडेसात वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समुदायातील शेकडो लोकांनी श्रीनिवास मूर्ती यांच्या घरासमोर गर्दी केली. संतप्त जमावाने मूर्ती यांच्या घारावर दगडफेक केली. एवढंचं नाहीतर तिथे असलेल्या 2-3 गाड्यांना आगही लावण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने आपाल मोर्चा डीजे हल्ली पोलीस स्थानकाकडे वळवला आणि तिथे तोडफोड केली.



संतप्त जमावाची आक्रमकता आणि उफाळलेला हिंसाचार शांत करण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली. या फायरिंगमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.


काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, 'मी अखंड श्रीनिवास मूर्ती सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, शांतता राखा. ज्याने ही चूक केली आहे, त्यासोबत चर्चा करून मी हे प्रकरण सोडवेल.' सोशल मीडिया पोस्टवरून उफाळलेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील अमीर-ए-शरीयतने देखील शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज्याचे गृहमंत्री बासवराज बोम्मई यांनी सांगितलं की, हिंसेत सहभागी असणाऱ्या लोकांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई होईल.