बारामुल्ला : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये  राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर रविवारी रात्री दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची बातमी ताजी असतानाच, ते दोन्ही दहशतवादी पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.


बारामुल्लामध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास 46 राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. रात्री दीडच्या सुमारास गोळीबार बंद झाल्याने दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र सकाळच्या सर्च ऑपरेशनमध्ये मृतदेह हाती न लागल्याने, दहशतवादी पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाल्याचं समजतं.

-------------------------

बारामुल्ला :
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये रविवारी रात्री दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.

46 राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या कॅम्पमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला.

या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाल्याचं समजतं.

दरम्यान रात्री दीडच्या सुमारास गोळीबार बंद झाला. मात्र खात्मा झालेल्या अतिरेक्यांचे साथीदार लपल्याची शक्यता वर्तवली जाते. रात्री सर्च ऑपरेशन पूर्ण न झाल्याने, आज सकाळी पुन्हा एकदा नव्याने सर्च ऑपरेशनला सुरुवात होईल.

वाचा : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान


उरीचा बदला, भारताचं सर्जिकल स्ट्राईक

उरीमध्ये भारतीय जवानांच्या कॅम्पवरील हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. एलओसी पार करुन भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांना खात्मा झाला.

बारामुल्लामध्येही उरीची पुनरावृत्ती करण्याचा अतिरेक्यांचा कट

बारामुल्लामध्येही उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा हा कट उधळून लावला. उरी हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा हा दुसरा चमू असण्याची शक्यता आहे.

कॅम्पवर हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कुठून आले की आधीपासून भारतात ठाण मांडून होते, याविषयी खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.

ज्या ठिकाणी हल्ला झाला, तिथे राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफचे कॅम्प आहेत. तर जवळूनच पाकिस्तानात उगम पावणारी झेलम नदी वाहते.

असा उधळून लावला दहशतवाद्यांचा कट!

कॅम्पमध्ये घुसून जवानांना निशाणा बनवण्याचा अतिरेक्यांचा इरादा होता. हॅण्ड ग्रेनेडने हल्ला करुन त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र गेटवर पहारेकऱ्यांनी त्यांना अडवलं. ग्रेनेड घेऊन आलेल्या दहशतवाद्यांवर पहारेकऱ्यांनी ग्रेनेडनेच हल्ला केला. राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर, दहशतवाद्यांनी बीएसएफ कॅम्पकडे मोर्चा वळवला. पण तिथेही त्यांची डाळ शिजली नाही. राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या जवानांनी अतिरेक्यांना वेढा घातला. त्यानंतर अडीच तासांच्या गोळीबारात दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.