मुंबई : जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणीतीही कंपनी समोर येत नसल्याने ही कंपनी दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आता वाढली आहे. सोमवारी जेट एअरवेजच्या कर्जदात्यांच्या बैठकीत हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाकडे (नॅशनल लॉ ट्रिब्युनल) पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


आर्थिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजची सेवा 17 एप्रिलला बंद करण्यात आली होती. त्यानंतर जेट एअरवेज दुसरी कंपनी खरेदी करणार कि दिवाळखोरीत निघणार असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. जेट एअरवेज खरेदी करण्याची इच्छा दाखवणाऱ्या एतिहाद आणि हिंदूजा समुहाने खरेदीसाठी कोणताही औपचारिक प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे जेट दिवाळखोरीत निघणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

जेट एअरवेजचं भविष्य ठरवण्यासाठी सोमवारी कर्जदात्यांची बैठक झाली. यामध्ये जेट एअरवेज साठी केवळ एक बोली लावण्यात आल्याने हे प्रकरण आयबीसी बाहेर सोडवणे शक्य नसल्याचा निर्णय घेण्यात आला. जेट एअरवेजच्या दिवाळखोरीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आता हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाकडे (नॅशनल लॉ ट्रिब्युनल) पाठवण्यात येणार आहे. स्टेट बँकेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. कंपनीवर 8500 कोटी रुपयांचे कर्ज आहे.