वाराणसी : बनारस हिंदू विश्वविद्यापीठात विद्यार्थिनींनी सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. तीन दिवसांपूर्वी विद्यापीठात एका विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाली. याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सुरु केलेलं आंदोलन 40 तास लांबलं होतं.


शनिवारी कुलगुरुंना भेटण्यासाठी आंदोलक विद्यार्थिनी त्यांच्या निवासस्थानी पोहचल्या. परंतु तिथे त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. विद्यापीठाच्या मेन गेटबाहेर पोलिसांनी हा लाठीचार्ज केला.

यामध्ये अनेक विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यातील एक जण गंभीर असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दगडफेक केली, तसंच गाड्यांची जाळपोळ केली.

सध्या 100 पेक्षा जास्त पोलिसांच्या गाड्या आणि एक हजाराच्या आसपास पोलिस, जवान बनारस हिंदू विद्यापीठात तैनात आहेत. मात्र विद्यार्थिनींचं आंदोलन थांबवण्यासाठी होणाऱ्या लाठीचार्जमध्ये एकही महिला पोलिस नसल्याची माहिती आहे.