नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदा भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक (बालाकोट) करण्यात आला होता. बालाकोट हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा थरकाप उडाला होता. आज या बालाकोट एअरस्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. जम्मू काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यानंतर भारताने ही कारवाई केली होती. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.


26 फेब्रुवारीच्या रात्री काय झालं होतं?


Balakot Air Strike : 26 फेब्रुवारी 2019 च्या रात्री जवळपास साडे तीन वाजता भारतीय हवाई दलाने भारतातून 12 मिराज 2000 लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. पाकिस्तानात प्रवेश करुन भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्प्सना लक्ष्य केलं होतं. भारताच्या हल्ल्यात हे दहशतवादी कॅम्पस् उद्ध्वस्त करण्यात आले. हवाई दलाच्या मिराज 2000 आणि सुखोई एसयू 30 या विमानांनी हा एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात जैशच्या जवळपास 250 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. उरी आणि बालाकोट या दोन्ही हल्ल्यानंतर भारताने दाखवून दिलं होतं की आता पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला आता चोख उत्तर दिलं जाणार आहे.


बालाकोट एअर स्ट्राईक का करण्यात आलं?


14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीर महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. त्यावेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या एका कारने ताफ्यातील एका ट्रकला जोरदार धडक दिली. त्यानंतर स्फोटकांनी भरलेल्या कारचा मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर जगभरातून पाकिस्तानवर टिकेची झोड उठली होती आणि पाकिस्तान दहशतवादाचं केंद्र असल्याचं पुन्हा एकदा जगासमोर आलं होतं. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देणे आवश्यक होते.


बालाकोटमध्ये वायुसेनेने टाकलेल्या पाचपैकी चार बॉम्ब्सचा दहशतवाद्यांच्या कॅम्पवर अचूक हल्ला


हवाई दलाचं 'ऑपरेशन बंदर'


पुलवामा हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली होती. पुलवामा हल्ल्याचा बदल घेण्याची भावना अनेकांची होती. पुलवामा हल्ल्याच्या 12 दिवसांनंतर 26 फेब्रुवारीच्या रात्री हवाई दलाचे मिराज 2000 विमानं पाकिस्तानच्या दिशेने निघाली. काही क्षणात हवाई दलाने बालाकोट येथे हल्लाबोल करत कामगिरी फत्ते केली आणि पुलवामा हल्ल्याच बदला घेतला. या संपूर्ण ऑपरेशनबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. या ऑपरेशनला  'ऑपरेशन बंदर' हे नाव देण्यात आलं होतं. या ऑपरेशनमध्ये नौदलाचाही सहभाग असणार होता. विशेष म्हणजे नौदलानेदेखील तयारी केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाने 'ट्रोपेक्स' या नावाच्या मिशनची तयारी केली होती. मिशन हाती घेतल्यानंतर भारतीय युद्धनौका आणि पानबुड्यांनी पाकिस्तानकडे वाटचाल सुरु केली होती.