नवी दिल्ली : अयोध्या खटल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आठवड्यातील पाच दिवस सुनावणी केली जाणार असल्याचे काल (गुरुवार) सुप्रीम कोर्टाने जाहीर केले. परंतु पाच दिवस सुनावणी घेण्यास मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी विरोध केला. पाचऐवजी तीनच दिवस सुनावणी घेण्याची मागणी धवन यांनी मांडली. ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.


धवन यांनी पाच दिवसांच्या सुनावणीला विरोध करत म्हटले की, मला खटल्याची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. तेव्हा सुप्रीम कोर्टाने धवन यांना सांगितले की, सुनावणी पाच दिवसच होईल. परंतु जेव्हा तुम्हाला उलटतपासणी घ्यायची असेल, तेव्हा तुम्हाला वेळ दिला जाईल किंवा सुनावणीत ब्रेक घेतला जाईल.

सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर सुरु असलेली सुनावणी आता आठवड्यातून पाच दिवस होणार आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक सुनावणी लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या निर्देशानुसार सर्वोच्च न्यायालय आठवड्यातून फक्त तीन दिवसच या प्रकरणाची नियमित सुनावणी करणार होतं. मात्र शुक्रवारच्या नियमित सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित दोन दिवस म्हणजे सोमवार आणि शुक्रवारीही या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले होते.

या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठापुढे सुरु आहे. सरन्यायाधीश गोगोई येत्या 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होणार की नाही, याविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. सरन्यायाधीशांच्या कार्यकाळात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली नसती तर पुन्हा या सर्व प्रकरणाची सुनावणी नव्याने करावी लागण्याची भिती होती. मात्र आता आठवड्याचे सर्व पाच दिवस सुनावणी होणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे आता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कार्यकाळातच अध्योध्येतील रामजन्मभूमीच्या जागेची मालकी कुणाची हे निश्चित होईल

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या अधिकाराचे दस्तावेज चोरीला, निर्मोही आखाड्याचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण

लवकरच अयोध्या खटल्याचा निकाल लागणार, सुप्रीम कोर्ट आठवड्यातून तीनऐवजी पाच दिवस सुनावणी घेणार