सावधान!, एटीएममधून पाच पेक्षा जास्त वेळा पैसे काढताय?
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2017 01:19 PM (IST)
मुंबई : नोटाबंदीनंतर एटीएमच्या व्यवहारावरील माफ केलेला चार्ज पुन्हा एकदा सुरु झाला आहे. मात्र यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण सरकारने 31 डिसेंबरनंतर एटीएम व्यवहाराच्या शुल्कमाफीच्या मुदतवाढीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. तुमचं खातं असलेल्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास महिन्याला पाच ट्रान्झॅक्शन मोफत करता येतात, सहाव्यांदा एटीएममधून पैसे काढताना अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. तर इतर बँकांच्या एटीएममधून महिन्याला तीन मोफत ट्रान्झॅक्शन्सची मुभा आहे. मात्र नोटाबंदीच्या काळात केवळ दोन हजार रुपयेच एका दिवशी काढण्याची मर्यादा होती. अनेकांना महिन्यातून पाचपेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढावे लागू शकतात. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत दर महिन्याला कितीही वेळा एटीएममधून पैसे काढले तरी शुल्कमाफी करण्यात आली होती. दरम्यान सध्या व्यवहार सुरळीत होत असले तरीही अनेक ठिकाणी एटीएममध्ये खडखडाट आढळतो. त्यामुळे नागरिकांना उपलब्ध असेल त्या एटीएमचा पर्याय निवडावा लागतो. मात्र एटीएम ट्रान्झॅक्शनच्या मर्यादेमुळे ग्राहकांची अडचण झाली आहे. नोटाबंदीपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि आयसीआयसीआय बँकेकडून पहिल्या पाच ट्रान्झॅक्शननंतर 15 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन एवढ शुल्क लावलं जात होतं. अन्य बँकांच्या तुलनेत या बँकांच देशभरातील एटीएम नेटवर्कचं जाळं मोठं आहे.