गुवाहाटी : महाराष्ट्रातला सततचा दुष्काळ आणि राज्य सरकारने लादलेली गोवंश हत्याबंदी यामुळे राज्यातील पशुधन चोरट्या मार्गाने बांगलादेशात पाठवलं जाऊ लागलंय. पशुधनाची चोरटी तस्करी करणाऱ्यांना राज्यातील गोवंश हत्याबंदीने महाराष्ट्रातील गोधन मोठ्या प्रमाणात तसंच स्वस्तात उपलब्ध झालंय. राज्यात गोवंश हत्याबंदी असल्यामुळे राज्यातील कत्तलखान्यांना गोधनाची विक्री करता येत नाही, याचा फायदा हे पशुधन तस्कर घेत आहेत.


 
आसामच्या बांगलादेशला लागून असलेल्या सीमावर्ती धुबरी जिल्ह्यातून हे पशुधन बांगलादेशात पाठवलं जात आहे. आसामच्या तीन जिल्ह्यांना बांगलादेशची सीमा आहे. जवळपास 263 किलोमीटरची बॉर्डर काचर, करीमगंज आणि धुबरी या जिल्ह्यालगत आहे. डुबरी जिल्ह्याच्या बांगलादेशला लागून असलेल्या 134 किमी सीमेपैकी तब्बल 44 किमीची सीमा ही ब्रह्मपुत्रा नदीने व्यापलेली आहे.

 
बॉर्डर पोलिसांनी काही पशुधन तस्करांना पकडल्यावर त्यांच्याकडून ही माहिती मिळाल्याचं बॉर्डर पोलिसांच्या सुत्रांकडून सांगण्यात आलं. कोलकात्यातून प्रकाशित होणाऱ्या एबीपी समूहाच्या दी टेलिग्राफ या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची बातमी प्रकाशित केलीय.

 
सततचा दुष्काळ आणि गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे महाराष्ट्रातून स्वस्तात आणि मुबलक पशुधन उपलब्ध होत असल्याचं या तस्करांनी सांगितलं.

 
बॉर्डर पोलीस नेहमीच भारतातून बांगलादेशात होणारी पशुधन तस्करी पकडत असतात. यापूर्वीच्या तस्करीमध्ये हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील गोधन मोठ्या प्रमाणावर हस्तगत केलं जायचं. मात्र आता या पशुधन तस्करांनी आपला मोर्चा बांगलादेशकडे वळवला आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे पशुधनाची मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत. गोवंश हत्याबंदी कायदा असल्यामुळे त्यांना राज्यातील कत्तलखान्यांना पशुधन विकता येत नाही. याचा फायदा राज्याबाहेरील दलाल घेतात. ते पशुधन सांभाळण्यासाठी घेत असल्याचं सांगतात, मात्र प्रत्यक्षात ते पशुधन चोरट्या मार्गाने बांगलादेशकडे रवाना केलं जातं.

 
आसामच्या धुबरी जिल्ह्यालगत असलेली बांगलादेशची सीमा ही नदीमुळे कुंपणविरहीत आहे. त्यामुळेच पशुधन तस्कर याच मार्गाचा वापर करतात. या तब्बल 44 किमीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफचे जवान लहान लहान बोटीतून गस्त घालतात. 44 किमीच्या जलमय सीमेची तैनाती बोटीतून करताना तस्कर अनेकदा चकवा देतात. मात्र जे तस्कर बीएसएफच्या तावडीत सापडतात, त्यांना बॉर्डर पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं.

 
अलीकडेच बॉर्डर पोलीसांनी पकडलेल्या तस्करांच्या चौकशीमध्ये तस्करांनी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पशुधन येत असल्याची कबुली दिलीय.

 
महाराष्ट्रातून बांगलादेशात नेण्यात आलेलं पशुधन तिथल्या बीफ प्रक्रिया उद्योगांना दिलं जातं, असंही या पशुधन तस्करांच्या चौकशीत समजलं.

 

भारत आणि बांगलादेशमधील ब्रह्मपुत्र नदीपात्रातील सीमेवर कुंपण नाही. अलीकडेच बीएसएफने छोट्या बोटींच्या सहाय्याने गस्त सुरू केलीय.