नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत लवकरच राहुल गांधी यांच्या जागी पक्षाचे नवे अध्यक्ष बनू शकतात. काँग्रेसमध्ये याबाबत तयारी झाली असून अशोक गहलोत यांना यासाठी तयार राहण्यासही सांगितलं आहे. 'नवभारत टाईम्स'ने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.


मात्र अशोक गहलोत एकटे काँग्रेसचे अध्यक्ष असणार की आणखी दोन-तीने नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं जाणार हे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पंरतु येत्या काही दिवसात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार असून तो गांधी कुटुंबातील नसेल.

अशोक गहलोत यांनी बुधवारी (19 जून) राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, देश आणि जनहितासाठी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहा, असा आग्रह केला होता. परंतु गहलोत यांनी मनधरणी करुनही राहुल गांधी यावर सहमत झाले नाहीत आणि पक्ष जोपर्यंत नवा अध्यक्ष निवडत नाही, तोपर्यंत नवी सुरुवात शक्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधींनी हे देखील स्पष्ट केलं की, त्यांच्या जागी प्रियांका गांधींच्या नावावरही विचार होऊ नये. भाजप कायमच काँग्रेसला घराणेशाहीवरुन टीका करत आली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर आणि पक्षाचा दुसरा नेता अध्यक्ष बनल्यानंतर हा मुद्दा कायमचा संपेल.

या कारणांमुळे अशोक गहलोत यांची चर्चा!

* संघटना चालवण्यासाठी जुना आणि गाढा अनुभव आहे. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उत्तम कामगिरीमागे गहलोत यांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातं.

* मागासवर्गीयांचं प्रधिनिधित्त्व करतात. काँग्रेसला जर गमावलेला जनाधार परत मिळवायचा असेल, तर या समुदायाकडून मतं मिळवण्याचं मोठं आव्हान असेल.

* सोनिया आणि राहुल गांधी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबतही त्यांचे संबंध चांगले आहेत.

...तर सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री?
सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक गहलोत काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतर राजस्थानचं नेतृत्त्व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे सोपवलं जाऊ शकतं. काही दिवसांपूर्वी गहलोत आणि पायलट गटामध्ये वादाचं वृत्त आलं होतं. मात्र अशोक गहलोत अध्यक्ष बनल्यानंतर ही अडचणही दूर होईल असं पक्षाला वाटतं.

राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जबाबदारी स्वीकारत 25 मे रोजी राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो प्रस्ताव सर्व नेत्यांनी फेटाळून लावला. मात्र राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहेत.

आणखी वाचा