बाबरी प्रकरणातील आरोपींचं 'पद्मविभूषण' काढणार का? : ओवेसी
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2017 05:46 PM (IST)
मुंबई : बाबरी मशिद प्रकरणी न्यायालयात होत असलेल्या दिरंगाईवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाने बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी कट रचल्याचा ठपका ठेवला आहे, मात्र आरोपींचं 'पद्म विभूषण' परत घेतलं जाणार का, असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. https://twitter.com/asadowaisi/status/854615665289965570 ओवेसी यांनी ट्विटरवरुन यासंबंधी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. बाबरी मशिद पाडणं ही देशासाठी शरमेची बाब असून, त्यास जबाबदार असलेलेच आता देश चालवत आहेत, अशी तोफही त्यांनी डागली. https://twitter.com/asadowaisi/status/854618251783012352 कल्याण सिंग पदाचा राजीनामा देऊन खटल्याला सामोरे जाणार का? की राज्यपालपदाच्या खुर्चीआड लपणार? मोदी सरकार न्यायाची कास धरुन त्यांना पदावरुन हटवतील, याबाबत शंका वाटते, असंही ओवेसींनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/asadowaisi/status/854616033784713216 महात्मा गांधी यांच्या हत्येचा खटला दोन वर्ष चालला, मात्र बाबरी मशिद पाडल्याचं प्रकरण त्याहून गंभीर असूनही त्याचा निकाल अजूनही लागला नाही, अशी खंत ओवेसींनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. https://twitter.com/asadowaisi/status/854611804835635200 गांधींच्या मारेकऱ्यांना निर्दोष ठरवून फासावर लटकवण्यात आलं, तर बाबरी प्रकरणातील दोषींना केंद्रीय मंत्रिपद आणि पद्म विभूषण बहाल करण्यात आलं. न्यायव्यवस्था फारच धीम्या गतीने काम करत आहे, असं ओवेसी म्हणाले आहेत. https://twitter.com/asadowaisi/status/854614782363799552 6 डिसेंबर 1992 हा दिवस लज्जास्पद, किंबहुना भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस होता. कायदा पायदळी तुडवल्याचा प्रकार कायम लक्षात राहील, असं ओवेसी म्हणतात. बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह 13 जणांवर गुन्हेगारी खटला चालणार आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती पीसी घोष आणि न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या याचिकेवर हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने हा खटल्याची सुनावणी दोन वर्षात पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार असून या दरम्यान न्यायाधीशांची बदली होणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलंं. राष्ट्रपतीपदाच्या चर्चेतून अडवाणी, जोशी बाद? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं चर्चेच्या केंद्रस्थानी होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अडवाणी तसंच जोशी यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. उमा भारती, अडवाणी पद सोडणार? कल्याण सिंह राज्यपाल असल्याने त्यांच्यावर खटला चालू शकणार नाही. पण उमा भारती यांच्यावर केंद्रीय मंत्रीपद आणि खासदार लालकृष्ण अडवाणी यांच्यावर खासदारकी सोडण्याचा नैतिक दबाव येऊ शकतो. काय आहे बाबरी प्रकरण? – अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी भाजप आणि विश्व हिंदू परिषदेची रॅली निघाली. – रॅलीमध्ये तब्बल 1 लाख 50 हजार कारसेवकांचा समावेश होता. – राम मंदिराच्या उभारणीसाठी कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला. – लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशींकडे रॅलीचं नेतृत्व होतं. – पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी बाबरी मशिदीवर चढाई केली. – कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी मशिदीचा घुमट पाडला. – या विध्वंसानंतर दिग्गज नेत्यांसह 68 जणांवर ठपका ठेवण्यात आला. – बाबरी मशिदीची जागा ही मूळ राम जन्मभूमी असल्याचा कारसेवकांचा दावा आहे. – मुघलांनी त्या जागी मशिद उभारल्याचाही कारसेवकांनी दावा केला.