नवी दिल्ली:  नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अखेर तब्बल ५० दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपात केजरीवाल यांना अंमलबाजवणी संचालनालयाकडून (ED) अटक करण्यात आली होती. देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं वातावरण तापलेलं आहे.  प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचाराला वेग देण्यात आला आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप वाढत असताना, अरविंद केजरीवाल यांच्या जामिनामुळे विरोधकांची ताकद वाढली असल्याचं मानलं जात आहे. आज अरविंद केजरीवाल पत्रकार परिषदेला संबोधित करतील.  


पत्रकार परिषद, रोड शोचं आयोजन


अरविंद केजरीवाल हे कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करतील. आम आदमी पक्षाच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद होणार आहे. यानंतर अरविंद केजरीवाल दक्षिण दिल्लीतील महरौली भागात रोड शो करतील. यानंतर सहा वाजता पूर्व दिल्लीच्या कृष्णानगरमध्ये देखील रोड शो करणार आहेत.  


अरविंद केजरीवाल यांनी जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. "मला तुमच्यात येऊन आनंद होतो आहे. या हुकूमशाही विरुद्ध मला लढायचं आहे. परंतु देशातल्या १४० करोड लोकांनी या लढाईत एकत्र आलं पाहिजे." असं ते म्हणाले. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल यांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे. 


अरविंद केजरीवाल यांचं ट्विट






ते जरी जामिनावर बाहेर आले असले, तरी जनता मद्य घोटाळा विसरणार नसल्याचं, अमित शहा यांनी म्हटलं आहे.  आप कडून अरविंद केजरीवाल यांच्यावर  'बंदे मे है दम!' हे प्रचार गीत देखील प्रकाशित करण्यात आलं आहे . केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पक्षानं  या मुद्द्यावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. आता केजरीवाल प्रत्यक्ष प्रचारात सक्रीय झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील प्रचार अधिक रंगतदार होणार आहे. आरोपांच्या या तोफांमध्ये जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज किती मांडला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल.  


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला होता. आता अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानं आम आदमी पक्षाचं बळ वाढणार आहे.


संबंधित बातम्या :


अजितदादा म्हणाले, तुझा कंड जिरवणार, आता निलेश लंकेंचं जोरदार उत्तर!


PM Modi ABP Exclusive : ओडिशा-बंगालचं राजकारण, मुस्लिमांना आरक्षण ते ईडीची कारवाई; पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास मुलाखत


Script By : Gourav Malak