नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकवरुन राजकारण सुरु झाल्यानंतर भारतीय सैन्याने या कारवाईचे पुरावे केंद्र सरकारला सादर केले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार सर्जिकल स्ट्राईकचा 90 मिनिटांचा व्हिडीओ सैन्याने सरकारला सोपवला आहे.


सर्जिकल स्ट्राईकबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालंसह काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम पुरावे मागत होते. त्यानंतर आता सैन्याने हा व्हिडीओ सरकारकडे सोपवला आहे.

मात्र हा व्हिडीओ जारी करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. हल्ल्याचं रेकॉर्डिंग करण्याचा उद्देश राजकीय नाही तर रणनीतीसाठी होता.

उरीचा बदला, भारताचं सर्जिकल स्ट्राईक

उरीमध्ये भारतीय जवानांच्या कॅम्पवरील हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. एलओसी पार करुन भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांना खात्मा झाला.

स्थानिकांच्या माहितीवर प्रत्यक्षदर्शींचा दावा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षदर्शींनी तोंडघशी पाडलं आहे. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमधून अज्ञातस्थळी नेऊन दफन केले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

कसा चित्रीत केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ?

सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ एकूण 90 मिनिटांचा आहे. हल्ला करण्यासाठी गेलेल्या कमांडोंच्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यातून तो शूट केला होता. ऑपरेशनदरम्यान कमांडोंच्या हेल्मेटमध्ये थर्मल इमेजिंग आणि नाईट व्हिजन कॅमेरे लावलेले होते. याशिवाय साऊथ ब्लॉकमधील सैन्याच्या मुख्यालयाला 25-30 महत्त्वाचे फोटोही पाठवले होते.