नवी दिल्ली : डोकलाम वाद सध्या निवळला असला तरीही भारताला कायम सतर्क राहावं लागणार आहे. याच गोष्टीचा उल्लेख करत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तान आणि चीनपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 'लष्करच नव्हे तर संपूर्ण देशाला चीन आणि पाकिस्तानसोबतच्या एकत्र युद्धाला तयार राहायला हवं.' असं लष्करप्रमुख यावेळी म्हणाले.

'प्रत्येक परिस्थितीसाठी आपण तयार असायला हवं'

'डोकलाम वादादरम्यान आपल्याला दिसून आलं की, शत्रूशी लढण्याआधी सायबर मीडिया, आणि इंफो वॉरफेअर सुरु झालं होतं. सुदैवानं सरळसरळ युद्ध झालं नाही. पण असं असलं तरीही आपण प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असणं गरजेचं आहे. कारण की, आपल्या दोन्ही बाजूलाही शत्रूच आहेत.' असं लष्करप्रमुख म्हणाले.

यावेळी लष्करप्रमुखांनी लष्कर, वायूदल आणि नौदलाच्या एकीकरणावरही जोर दिला. दरम्यान, चीननं मागील वर्षीच आपल्या लष्कराचं एकीकरण केलं आहे.

'भारत पाकिस्तानचे तुकडे करेल अशी खोटी भीती तेथील लोकांच्या मनात भरवण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान भारतविरुद्ध कायम छुप्या युद्धाचा आधार घेतं.' असंही लष्करप्रमुख म्हणाले.