नवी दिल्ली : 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस कुणीही विसरु शकत नाही. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा दिवस भाजपच्या वतीने देशभरात ‘काळापैसाविरोधी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.


काळा पैसा बाहेर काढण्याचं लक्ष्य ठेवून केंद्र सरकारने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदी जाहीर केली होती. पण या निर्णय चुकीचा असल्याचं मत अनेक अर्थ तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे विरोधकांनीही या निर्णयला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा काळा दिवस साजरा करण्याचं घोषित केलं.

त्याला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर देताना ‘काळापैसा विरोधी दिन’ हा दिवस साजरा करणार असल्याचं सांगितलं.

यानिमित्त भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री देशभरात दौरा करणार आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने काय पाऊलं उचलली, याबाबत माहिती मंत्र्यांकडून दिली जाणार आहे, अशी माहिती अरुण जेटलींनी दिली.

"काळा पैशांविरोधात सरकारने एसआयटी स्थापन केली. तसेच काळा पैसा दडवणाऱ्यांना वेळोवेळी संधी दिल्या. शिवाय, जी-20 देशांव्यतिरिक्त इतर अनेक देशांशी काळा पैशा दडवलेल्यांची यादी देण्यासंदर्भात करार केले. स्वित्झर्लंडमध्येसोबतही यासाठी करार केला," असंही अरुण जेटलींनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, यावेळी अरुण जेटलींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. "काही आठवड्यांपूर्वी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते निवडणूक आयोगाचे गोडवे गात होते. पण आता निवडणूक आयोगावरच प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसने आपला जनाधार गमावला असल्याने ते असे बेच्छुट आरोप करत आहेत," अरुण जेटली यावेळी म्हणाले.