Amritpal Singh Arrested: एक मोठी बातमी समोर येत असून, वारीस पंजाब दीचा प्रमुख फरार असलेला अमृतपाल सिंहला (Amritpal Singh) अखेर 36 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतः आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे. अमृतपालला तब्बल 36  दिवसांनी पोलिसांनी पकडले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. तर त्याची पत्नी किरणदीप कौर हिला तीन दिवसांपूर्वी अमृतसर विमानतळावर गुरुवारी (21 एप्रिल) थांबवण्यात आले होते. त्यानंतर सोडून देण्यात आले होते. विशेष म्हणजे अमृतपाल सिंहच्या इतर साथीदारांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपालची रवानगी दिब्रुगड तुरुंगात होऊ शकते.


खलिस्तानवादी अमृतपाल सिंगचा (Amritpal Singh) गेल्या 36  दिवसांपासून पंजाब पोलिसांसह देशातील वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांकडून शोध सुरु  होता. विशेष म्हणजे देशातील महत्वाच्या सुरक्षा यंत्रणांकडून देखील त्याचा शोध सुरु होता, पण त्यांना यश मिळत नव्हते.  तर आधी पटियाला, नंतर हरियाणातील शाहबाद आणि नंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी अशाप्रकारे अमृतपाल सतत आपली ठिकाणं बदलत होता. तसेच यूपी सीमेवरून ते नेपाळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या बहराईचमधील सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र एवढ करूनही अमृतपाल सिंहचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र आज अमृतपाल सिंहने स्वतःच आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे. 






अमृतपालच्या पत्नीला विमानतळावर अडवले...


अमृतपाल सिंह (Amritpal Singh) याच्या पत्नीला अमृतसर विमानतळावर अडवत पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. अमृतपाल सिंहची पत्नी किरणदीप कौर (Kirandeep Kaur) ही लंडनला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती, मात्र विमानात बसण्यापूर्वीच पोलिसांना माहिती मिळाल्याने तिला ताब्यात घेण्यात आले होते. किरणदीप कौर सकाळी 11.40 वाजता विमानतळावर पोहोचली, दुपारी 2.30 च्या फ्लाईटने ती ब्रिटनला जात होती. पण लूक आऊट नोटीस जारी असल्यामुळे इमिग्रेशनने किरणदीप कौरला प्रवास करु दिला नाही आणि तिला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 


कोण आहे अमृतपाल सिंह?


अमृतपाल सिंग वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख असून, त्याचा जन्म 1993 मध्ये अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा गावात झाला. तर अमृतपाल तरसेम सिंह यांचा तो मुलगा आहे. अमृतपाल 2012 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पंजाबहून दुबईला नोकरीसाठी गेला होता. तो 10 वर्षे म्हणजे 2022 पर्यंत दुबईत वास्तव्यास होता. दुबईत त्याच्या काकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. शेतकरी आंदोलनादरम्यान अमृतपाल दीप सिद्धूसोबत दिल्ली सीमेवर आला. त्याने सप्टेंबर 2022 मध्ये पुन्हा केस ठेवून दस्तरबंदी केली आणि मोगाच्या रोडे गावात दस्तरबंदीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर तो दीप सिद्धूच्या 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख बनला. अमृतपालने पंजाबमध्ये धार्मिक यात्राही सुरु केली. खलिस्तानी चळवळीत ग्रामीण तरुणांना सामील करण्यास सुरुवात केली असल्याचं बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Amritpal Singh Wife : फरार अमृतपालच्या पत्नीचा लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न; अमृतसर विमानतळावरून पोलिसांनी घेतलं ताब्यात