Amarnath Yatra 2022 : आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष रद्द झाल्यानंतर यंदाच्या वर्षी होत असलेल्या बाबा बर्फानी (Baba Barfani) यांच्या यात्रेला यात्रेकरूंचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पहलगाम बेस कँमवर सुमारे 10 हजार यात्रेकरु पोहोचले आहेत. यंदाची अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार आहे. आजपासून सुरु झालेल्या यात्रेची सांगता 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. 


जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडे तणावाचं वातावरण आहे, यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलीस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे. पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय परिसरात अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत. 


दररोज सुमारे 10 हजार भाविकांना मिळणार दर्शन
पहलगाम आणि बालटाल येथील बेस कँपमधून दररोज सुमारे 10-10 हजार भाविक बाबा बर्फानी यांच्या दर्शनाला पोहोचणार आहेत. यात्रेला मोठा जनसागर लोटण्याची शक्यता असल्याने दहशतवादाचं सावट आहे. या पार्श्वभूमीवर सैन्य दलही सतर्क आहे. कोरोनामुळे यात्रा दोन वर्ष रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यंदा यात्रेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.


8 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता
यंदा अमरनाथ यात्रेसाठी जास्तीत जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी 2018 मध्ये यात्रेसाठी 2.85 लाख भाविक आले होते. 2011 मध्ये सर्वाधिक 6.35 लाख यात्रेकरू आले होते. तर यंदाच्या वर्षी यात्रेसाठी आठ लाखांहून अधिक भाविक यात्रेसाठी येऊ शकतात, असा जम्मू-काश्मीर प्रशासनाचा अंदाज आहे.


कडेकोट सुरक्षा व्यवस्था
कोरोना महामारीमुळे ही यात्रा तीन वर्ष रद्द झाली होती. यात्रेसाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली असून प्रशासन सतर्क आहे. त्यासाठी जवानांकडून परिसरात पाळत ठेवली जात आहे. ड्रोनच्या निगराणीची व्यवस्था करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या