Amarnath Yatra 2022 : ढगफुटीनंतर 4 दिवस ब्रेक लागलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. भाविक बालटालमार्गे बाबा बर्फानीच्या गुहेकडे रवाना होत आहेत. पहलगामनंतर (Pahalgam) आज अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) बालटाल मार्गे सुरू झाली आहे. 8 जुलै रोजी पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर (Cloudburst) पूर आला होता. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला, तर 41 जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही. बचाव पथक तीन दिवसांपासून अपघातग्रस्त भागाचा शोध घेत आहे. शुक्रवारी (8 जुलै) झालेल्या ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली होती. आता पहलगामचा रस्ता भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. बाबांचे भक्त पहलगाम आणि बालटाल मार्गे अमरनाथ गुहेत पोहोचत आहेत. 


श्राइन बोर्डकडून यात्रेचे व्यवस्थापन
पवित्र अमरनाथ गुहा दक्षिण काश्मीरमध्ये 3880 मीटर उंचीवर आहे. अमरनाथ श्राइन बोर्ड  (Amarnath Shrine Board)  वार्षिक अमरनाथ यात्रेचे व्यवस्थापन करते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे त्याचे अध्यक्ष आहेत. 


राजभवनने स्पष्टीकरण दिले
धोकादायक ठिकाणी तीर्थक्षेत्र शिबिर उभारल्याच्या आरोपांवर राजभवनने स्पष्टीकरण दिले आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, राजभवनच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवारी ढगफुटी होऊन पूर आला, आणि तो अपेक्षेपेक्षा जास्त होता आणि यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. 


स्थगित अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात
अमरनाथ गुहेजवळ (Amarnath Cloudburst) ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कँम्पमधून (Base Camp) यात्रेकरुंचा पहिला गट अमरनाथच्या गुहेकडे जाण्यासाठी रवाना झाला आहे. यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.




 



दोन वर्षानंतर होतेय अमरनाथ यात्रा
अमरनाथ यात्रा दोन वर्षानंतर होत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. आता स्थगित यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यात्रेकरुंनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'आम्ही बाबा बर्फानी यांचा आर्शिवाद घेण्याचं ठरवून आलो आहे. त्यामुळे भगवान शंकराचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही घरी परतणार नाही. यात्रेवेळी अचानक दुर्घटना घडली. मात्र यात्रा पुन्हा सुरु झाल्याने आम्ही आनंदी आहोत.'


महत्त्वाच्या इतर बातम्या