जयपूर : राजस्थानातील बेरोजगारांना 1 मार्चपासून भत्ता मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. काल राजस्थान विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन अशोक गेहलोत यांच्याहस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुलांना तीन हजार तर मुलींना तीन हजार पाचशे रुपये भत्ता मिळणार आहे.


राजस्थानात शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिल्यानंतर आता बेरोजगार युवकांना रोजगार भत्ता देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे. देशात काँग्रेसचं सरकार आलं तर काँग्रेसही गरिबांनी किमान वेतन देईल अशी घोषणा राहुल गांधींनी केली होती.

"2019 मध्ये काँग्रेसचा विजय झाला तर काँग्रेस सरकार मिनिमम इन्कम गॅरंटी म्हणजे किमान उत्त्पन्नाची हमी देईल. याचा अर्थ असा की भारतातल्या प्रत्येक गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात एक निश्चित रक्कम किमान उत्त्पन्नाच्या रूपात सरकार देईल," अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायपूर येथे झालेल्या किसान आभार संमेलनात केली होती.

अशोक गेहलोत यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरल्यास राहुल गांधींची ही घोषणा प्रत्यक्षात येणं शक्य असल्याचं मानलं जात आहे.