नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत 2012मधील निर्भया गँगरेपच्या घटनेला सात वर्ष लोटूनही चार दोषींना अद्याप फाशीची शिक्षा झालेली नाही. हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर, दिल्लीतील निर्भया गँगरेपच्या दोषींना फासावर कधी लटकावणार असा प्रश्न देशभरातून उपस्थित केला जात आहे. तसेच या चारही नराधमांना लवकरात लवकर फासावर देण्यात यावं, अशीही मागणी संपूर्ण देशभरातून होत आहे. अशातच निर्भयाच्या आईने दोषींना लवकरात लवकर फासावर देण्याची मागणी करत दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार होती. परंतु, याप्रकरणीची आजची सुनावणी टळली असून 18 डिसेंबरला दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.


कोर्टाला माहिती देणार दोषींचे वकील आणि तुरूंग प्रशासन

कोर्टाने सुनावणी दरम्यान निर्भया गँगरेप घटनेतील चारही दोषींकडून याचिकेवर त्यांची बाजू मागितली होती. तसेच तिहार तुरूंग प्रशासनाकडूनही दोषींनी फाशीच्या शिक्षेवर फेरविचार करण्याबाबत कुठे-कुठे याचिका दाखल केल्या आहेत, याची माहिती मागवली होती. त्यामुळे तिहार तुरूंग प्रशासनासोबतच दोषींचे वकीलही कोर्टात याबाबत माहिती देणार आहेत. दरम्यान, निर्भयाच्या आईने चारही दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.

पाहा व्हिडीओ : सर्व चार दोषींना तिहार जेलमध्ये हलवलं, लवकरच फासावर लटकवण्याची शक्यता



फाशीची तारीख निश्चित करा : निर्भयाच्या आईची मागणी

निर्भयाच्या आईचं म्हणणं आहे की, दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली असूनही ते अजून जेल मध्येच बंद आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात डेथ वॉरंट जारी करा आणि त्यांच्या फाशीची तारिख निश्चित करा. तसेच कोर्टाने तिहार तुरूंग प्रशासनाकडून माहिती मागवण्यासोबतच गरज पडल्यास दोषींना व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे हजर करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे 18 तारखेला होणाऱ्या सुनावणी दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चारही दोषींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

निर्भया प्रकरणातील दोषी अक्षय ठाकूरची फेरविचार याचिका

निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील चारही दोषींना 16 डिसेंबर रोजीच फासावर लटकवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. अशातच निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयने फाशीच्या शिक्षेवर फेरविचार करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून फाशी न देण्याबाबत अजब मागणी न्यायालयाकडे केली आहे. दिल्लीत वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे, येथील पाणीही विषारी झालं आहे, यामुळे आयुष्य आधीच कमी होत आहे. अशातच फाशी देऊन माझं आयुष्य का कमी करताय?'; असा प्रश्न निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयने उपस्थित केला आहे. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने यासाठी त्याने वेद, पुराण, उपनिषद यांसारख्या ग्रंथांचाही हवाला दिली आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, सतयुग आणि त्रेतायुगात लोक हजारो वर्ष जगू शकत होती. पण कलियुगात माणूस जेमतेम 50 वर्षचं जगतो. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची गरज काय? असा अजब दावा त्यानं केला आहे. दरम्यान, याप्रकरणातील इतर तीन जणांच्या याचिका न्यायालयाने आधीच फेटाळून लावल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

दिल्लीतील प्रदूषणामुळे लोक तसंही मरतायत, मला फाशी देऊ नका; निर्भया प्रकरणातील दोषीची अजब विनंती

Nirbhaya Case | सर्व चार दोषींना तिहार जेलमध्ये हलवलं, लवकरच फासावर लटकवण्याची शक्यता