लखनऊ: बिहारमध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी आता आपलं लक्ष उत्तर प्रदेशवर केंद्रीत केलंय. समाजवादी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या आजमगडचा त्यांनी दौरा केला. या दरम्यान त्यांनी अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.


असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "कुणी काहीही म्हणो, आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे घाबरले आहेत. त्यांना वाटणारी भिती हाच आमचा विजय आहे." आजमगड हा समाजवादी पक्षाचा गड मानला जातोय. या ठिकाणाहून समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव लोकसभेवर निवडून गेले होते. आजमगडमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी असून या ठिकाणच्या मुस्लिम मतांच्या दिशेवरुनच पूर्व उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांची दिशा ठरते असं म्हटलं जातं.


असदुद्दीन ओवैसी हे केवळ आठच तास या भागाच्या दौऱ्यावर होते. पण त्यांच्या या दौऱ्याने उत्तर प्रदेशचे राजकारण तापलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेता या भागातल्या मुस्लिम मतांवर औवेसींची नजर आहे. या ठिकाणी औवेसींनी कोणतेही भाषण दिलं नाही पण त्यांना जो राजकीय संदेश द्यायचा होता तो त्यांनी दिल्याचं सांगण्यात येतंय.


भागवत म्हणाले, 'हिंदू आहे म्हणजे देशभक्त असणारच', ओवैसींनी विचारलं, 'गोडसेंबद्दल काय विचार आहे?'


उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी निवडणुका
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. एकूण 403 सदस्यांची संख्या असणाऱ्या विधानसभेत भाजपचे बहूमत आहे. योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व हे आक्रमक हिंदुत्ववादी स्वरुपाचे आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे ध्रृवीकरण करण्यावर औवेसी यांचा भर असल्याचं सांगण्यात येतंय.


पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या ही 20 ते 40 टक्के इतकी आहे. आतापर्यंत ही मते समाजवादी पक्षाच्या पारड्यात पडायची. आता या मतांवर असदुद्दीन ओवैसी यांची नजर आहे. त्यामुळे या परिसरावर औवेसी यांनी लक्ष केंद्रीत केल्याचं सांगण्यात येतंय.


ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात : योगी आदित्यनाथ


लहान पक्षांची मोट-संकल्प मोर्चा
बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशातही ओवैसी यांनी लहान पक्षांचा गट बनवला असून त्याचे नाव आहे संकल्प मोर्चा. यात ओम प्रकाश राजभर, बाबू सिंह कुशवाह आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर या नेत्यांचा समावेश आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील 100 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये मुस्लिम मते निर्णायक ठरतात. समाजवादी, बसप आणि कॉंग्रेसला आतापर्यंत मिळत असलेली ही मते आता एमआयएमच्या पारड्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप
असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर समाजवादी पक्षाने त्यांच्यावर नेहमीप्रमाणे भाजपची 'बी टीम' म्हणून टीका केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीन ओवैसीनी सांगितलं की टीका करणाऱ्यांना वाटत असलेली भिती हाच आमचा विजय आहे.


मागील 15 वर्षांपासून वाराणसीचे गाऊन वापरतात रोम, अमेरिकेतील फादर