कुशीनगरच्या डिव्हाईन मिशन स्कूलचे विद्यार्थी ज्या स्कूल बसमधून जात होते, ती मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करत होती. यावेळी वेगाने आलेल्या पॅसेंजर ट्रेनने स्कूल बसला उडवलं आणि यात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्कूल बसचालक इयरफोन लावून गाडी चालवत होता, ज्यामुळे त्याला ट्रेनचा आवाज आला नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. शिवाय चालकाला एका व्यक्तीने थांबण्याचाही इशारा दिला, पण तो थांबला नाही.
या घटनेमुळे उत्तर प्रदेशात शोककळा पसरली आहे. पोलीस आणि प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. सर्वांना गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. शिवाय जखमींना मोफत उपचार आणि योग्य ती मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.