नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमातून मागील महिन्यात केला होता. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या दाव्याचा 'एबीपी न्यूज'ने पर्दाफाश केला आहे. देशातील शेतकऱ्यांची स्थिती काहीच बदलेली नाही, हे वास्तव 'एबीपी न्यूज'ने समारे आणलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जूनला शेतकऱ्यांशी एका कार्यक्रमातून संवाद साधला होता. या कार्यक्रमात मोदींनी छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील चंद्रमणी या शेतकरी महिलेशी वार्तालाप केला होता. त्यावेळी तुमचं उत्पन्न किती वाढलं? असा प्रश्न मोदींनी या शेतकरी महिलेला विचारला होता. मोदींच्या प्रश्नाला उत्तर देताना महिलेने माझं उत्पन्न दुपटीने वाढल्याचं म्हटलं होत.

मात्र, एकीकडे सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी नाराज असताना या महिलेचं उत्तन्न दुप्पट कसं झालं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी 'एबीपी न्यूज'ने थेट छत्तीसगड गाठत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चंद्रमणी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी चंद्रमणी यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती.

आपलं उत्पन्न दुप्पट झालं नसल्याची माहिती चंद्रमणी यांनी एबीपी न्यूजला दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रश्नावर तुम्ही उत्पन्न दुप्पट झाल्याचं उत्तर कसं दिलं? असा प्रश्न एबीपी न्यूजच्या प्रतिनिधीने चंद्रमणी यांना विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, 'दिल्लीतील अधिकाऱ्यांचं एक पथक गावात आलं होतं. त्यांनी पंतप्रधानाच्या प्रश्नांना काय आणि कशी उत्तरं द्यायची याचं ट्रेनिंगही दिलं होतं. त्या अधिकाऱ्यांनीच तुमचं उत्पन्न दुप्पट झाल्याचं सांगा, असं सांगितलं होतं.'

चंद्रमणी यांच्या खुलशानंतर मोदींच्या दाव्यांबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहे. विरोधकांनाही मोदी सरकारवर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एबीपी न्यूजच्या बातमीचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.


एबीपी न्यूजने केलेल्या पोलखोलीनंतर भाजप नेते विरोधकांना काय आणि कशी उत्तर देतात हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या


खरीपातील 14 पिकांचा हमीभाव दीडपट वाढवला, मोदी सरकारचा निर्णय


गेल्या वर्षभरात 70 लाख लोकांना रोजगार दिला, मोदींचा दावा