तवांग  (अरूणाचल प्रदेश) : डोकलाम वादावरुन भारतानं चीनला बरंच नामोहरम केलं आहे. चीनचा फक्त डोकलामच नव्हे तर  अरुणाचल प्रदेशमधील तवांगवरही डोळा आहे. हा प्रदेश बळकवण्यासाठी चीन वारंवार प्रयत्न करत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट तवांगमध्ये पोहचली.




तवांग हा अरूणाचल प्रदेशातला सर्वात सुंदर प्रदेश आहे. अरूणाचलच्या पश्चिम भागात असणारं तवांग शहर स्वर्गाची अनुभूती देतं. इथल्या नयनरम्य निसर्गाचा आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक इथे येतात. सुमारे 10 हजार फुटांवर असणारं हे शहर असंख्य तलावांनी वेढलेलं आहे.



तवांग शहर हे सहाव्या दलाई लामांचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, चीन त्यावर दावा सांगत आहे. चीनचं म्हणणं आहे की 15व्या शतकात दलाई लामांचा जन्म तवांगमध्ये झाला होता. त्यामुळेच तवांग हा तिबेटचा हिस्सा असल्याचा दावा चीनचा आहे.



तवांगवर ताबा मिळवण्यासाठी चीन इतका आसुसलेला आहे की, तवांगच्या बदल्यात भारताला अक्साई चीन देण्याचीही त्यांची तयारी आहे. चीनचे एक ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी दाई बिंगुओ यांनी एका मुलाखतीत याचं सूतोवाच केलं होतं.



याच बिंगुओ यांना चीननं भारतबरोबरच्या सीमावादावर चर्चा करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून नेमलं होतं. परंतु आजवर चीनच्या हाती काहीही लागलं नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चीनच्या जनतेनंसुद्धा चीनच्या या दाव्याला पाठिंबा दिलेला नाही.



तवांगमधल्या प्रत्येकाला आपण भारतीय असण्याचा अभिमान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तवांगच्या मुद्द्यावरून चीन बराच आक्रमक झाला आहे.  त्यामुळेच दलाई लामांची यात्रा चीनच्या डोळ्यात खुपते. सोबतच तवांगमधल्या भारतीयांचं देशप्रेम बघून चीनला संताप येतो.



तवांगमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुलांनी प्रभातफेरी काढली आणि प्रत्येकाच्या ओठात भारताच्या गौरवाचे बोल होते. स्वातंत्र्याचा हा दिवस तवांगमध्ये सोहळ्यासारखा साजरा होतो.



जाणकार म्हणतात की चीननं तवांगवर जर कब्जा केला तर चीन उद्या अरूणाचल प्रदेशावरही आपला दावा सांगू शकतो. तवांगच्या बदल्यात आपल्याला जो अक्साई चीन देण्याची भाषा चीन करतो आहे त्या अक्साई चीनचा भाग बर्फाळ आणि नापीक आहे. त्यामुळं भारतासाठी तो भाग महत्वाचा नाही.



चीननं अरूणाचल प्रदेशाच्या मोठ्या भूभागावर कब्जा केला होता, तो भाग पुन्हा अरूणाचलमध्ये विलिन करण्यात आला आहे. पण तो भाग तवांग असता तर चीननं तो कधीच सोडला नसता.

आता चीनला लगाम घालण्यासाठी भारताकडून बोमदिला आणि तवांगच्या मध्ये असणाऱ्या 171 किलोमीटरच्या रस्त्यावर दोन सुरूंग बनवण्याचं काम सुरू आहे. हा संपूर्ण भाग बर्फाळ असल्यामुळे इथे फौजा तैनात करण्यात अडचणी येतात. बऱ्याचदा या भागात भूस्खलनही होतं. तरीही या भागात भारतीय सैन्याची एक फळी तैनात आहे.



या सगळ्यातून निश्चित होतं की चीनच्या कारवायांमागे तवांगचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. ज्यामध्ये चीनच्या हाताला काही लागत नाही.