नवी दिल्ली : अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड, मोबाईल सिम कार्डची आधारशी जोडणी अनिवार्य केल्यानंतर आता वाहन चालवण्याच्या परवान्याची (ड्रायव्हिंग लायसन्स) आधारशी जोडणी करावी लागणार आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे. फगवाडा येथे सुरू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये प्रसाद बोलत होते.


रवीशंकर प्रसाद म्हणाले की 'काही वेळा असे होते की, "एखादा वाहन चालक अपघात करून तिथून पळून जातो. त्यानंतर तो नवीन वाहन परवाना बनवतो. त्यामुळे अशा लोकांवर लगाम लावता येत नव्हता. आता आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक केल्यामुळे गैरव्यवहारांना, अपघात करुन पळू जाणाऱ्यांना आळा बसेल. यासाठी केंद्र सरकार आधार आणि ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करणे बंधनकारक करणार आहे".

एखाद्या गैरव्यवहारानंतर, अपघातानंतर पळून गेलेला चालक स्वतःचे नाव नाव बदलून नवीन परवाना मिळवू शकतो. परंतु त्याचा परवाना आधारशी लिंक असल्यामुळे तो नवीन परवाना मिळवू शकत नाही. कारण एखादी व्यक्ती स्वत:चं नाव बदलू शकते. परंतु ती स्वत:चे बायोमेट्रिक्स (डोळ्यांचं बुबुळ आणि हाताच्या बोटांचे ठसे) बदलू शकत नाही.