नवी दिल्ली : पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीने केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकात रिद्धीमा पांडेने सरकारविरोधात खटला दाखल केला आहे.


देशातील हवामान बदल, वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास या विषयांवर उत्तराखंडची रहिवासी असलेल्या रिद्धीमाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकार पर्यावरणसंबंधी कायद्यांचं पालन करण्यात अपयशी ठरल्याचा दावा चिमुरडीने केला आहे.

रिद्धीमासारख्या तरुणांवर हवामानातील बदलामुळे सहजरित्या घातक परिणाम होऊ शकतात. मात्र अशा व्यक्ती त्यासंबंधी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा घटक होऊ शकत नाहीत. त्यामुळे हे दुष्परिणाम टाळण्यासाठी विज्ञान आधारित, प्रभावी उपाय योजावेत, असं 52 पानी याचिकेत सरकारला सुचवण्यात आलं आहे.

याचिकेला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय पर्यावरण विभाग आणि केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाला दिले आहेत.

जगातील सर्वाधिक प्रदुषित दहा शहरांच्या यादीत भारतातील चार शहरांचा समावेश होतो. 2015 मध्ये वायू प्रदुषणामुळे जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक बळी एकट्या भारतातले असल्याचं एका संशोधनातून पुढे आलं आहे.