मुंबई : महाराष्ट्रासह देशातल्या 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे..  कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी या संभाव्य हल्ल्याचं पत्र लिहून याबाबत यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


ज्या शहरांना समुद्रकिनारा लाभला आहे. त्या शहरांमध्ये हल्ल्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मुंबईसह सर्व महत्वाच्या शहरांमध्ये कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोवा, तमिलनाडु, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगानासह 8 राज्यांना अलर्टच्या सूचना दिल्या आहेत. एका व्यक्तीनं बंगळूरच्या पोलीस कंट्रोल विभागात फोन करुन या हल्ल्याची माहिती दिल्याची बोललं जातंय.



श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आधीपासूनच किनारा लाभलेल्या राज्यांमधील  कोस्ट गार्ड, कोस्टल मरीन पोलीस आणि स्थानिक पोलिसांना अलर्ट देण्यात आलेले आहेत.

श्रीलंका बॉमस्फोटामध्ये सहभागी असणारे काही दहशतवादी समुद्री मार्गाने भारतात घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्वामी सुंदर मूर्ती नावाच्या एका व्यक्तीने शुक्रवारी बंगळुरू सिटीच्या कंट्रोल रूमला फोन करून याबाबत माहिती दिली. तामिलनाडु, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, पुद्दुचेरी, गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील मोठी शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. दहशतवादी या राज्यांमध्ये ट्रेनवर हल्ला करण्याची शक्यता आहे. तामिलनाडुच्या रामनाथपुरममध्ये 19 दहशतवादी असल्याचा दावा देखील मूर्तीने केला आहे.