विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे एका फार्मा कंपनीतून वायू गळती झाली. आज (7 मे) सकाळी ही घटना घडली. विशाखापट्टणमच्या आर आर वेंकटपुरम गावात एलजी पॉलिमर कंपनीतून वायू गळती झाली. यामुळे एका बालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.


वायू गळतीमुळे गावासह संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने आजूबाजूची पाच गावं रिकामी केली आहेत. एलजी पॉलिमर कंपनीच्या तीन किमी परिसरात वायू गळतीचा परिणाम दिसत आहे.


डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास अडचण असा त्रास नागरिकांना होत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसंच लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


सरकारी रुग्णालयात आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये बहुतांश लहान मुलं आणि वयोवृद्धांचा समावेश आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये 150 ते 170 लोकांना दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय अनेकांना गोपालपुरमच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. 1500 ते 2000 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.


एलजी पॉलिमर्स इंडस्ट्रीची स्थापना 1961 मध्ये हिंदुस्तान पॉलिमर्स नावाने झाली होती. ही कंपनी पॉलिस्टायरेने आणि को-पॉलिमर्सची निर्मिती करते. 1978 मध्ये यूबी ग्रुपच्या मॅकडॉवल अँड कंपनी लिमिटेडमध्ये हिंदुस्तान पॉलिमर्सचं विलिणीकरण झालं आणि मग ही एलजी पॉलिमर्स इंडस्ट्री बनली.


अधिकारी घटनेवर नजर ठेवून आहेत : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणममधील घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. "मी यासंदर्भात गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ते या घटनेवर नजर ठेवून आहेत. मी सगळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो," असं ट्वीट मोदींनी केलं आहे.


काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मदत करावी : राहुल गांधी
"विशाखापट्टणमधील घटनेने मोठा धक्का बसला. या परिसरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आवश्यक मदत पुरवावी. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. तर ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत, ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो," असं राहुल गांधी यांनी म्हटलं.