PM Narendra Modi : ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आज राज्यसभेतून 72 सदस्य निवृत्त झाले. या सदस्यांना आज राज्यसभेत निरोप देण्यात आला, यावेळी पंतप्रधान बोलत होते. निवृत्त होणाऱ्या सगळ्यांजवळ मोठा अनुभव, अनुभवाची ताकद मोठी असते. त्यामुळं समस्यांचे निराकरण होते असेही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.


मी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना परत येण्यास सांगेन असे मोदी म्हणाले. अनुभवातून जे काही मिळाले त्यात समस्या सोडवण्याचे सोपे उपाय आहेत. अनुभवाचे मिश्रण असल्यानं चुका कमी केल्या जातात. अनुभवाचे स्वतःचे महत्त्व आहे. असे अनुभवी साथीदार जेव्हा घर सोडून जातात तेव्हा घरात, राष्ट्रामध्ये त्यांची कमतरता जाणवते असेही मोदी यावेळी म्हणाले. आज निरोप घेणार्‍या साथीदारांकडून आपण जे काही शिकलो आहोत त्याचा उपयोग करु. आज आपणही संकल्प करु की, या सदनातील पवित्र स्थानाचा उपयोग आपण समाजाला पुढे नेण्यासाठी नक्कीच करु जे देशाच्या समृद्धीसाठी उपयुक्त ठरेल. सध्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव सुरु आहे. आपल्या महापुरुषांनी देशासाठी खूप काही दिले, आता देण्याची जबाबदारी आपली आहे. आता तुम्ही मोकळ्या मनाने मोठ्या व्यासपीठावर जाऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला प्रेरित करण्यात हातभार लावू शकता असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.




 
सदनात आपला जो सर्वोत्तम कालखंड राहिला आहे किंवा चांगले काम राहिले आहे. तो अनुभव आपण शब्दबद्ध करा. तसेच ते अनुभव सांगा असेही मोदी म्हणाले. हे अनुभव येणाऱ्या अनेक पिढ्यांना तो अनुभव कामी येईल असेही मोदी यावेळी म्हणाले. देशाच्या चांगल्या निर्णय प्रक्रियेत आपलं योगदान पाहिले आहे. त्याचे जतन करा. हा मौल्यवान ठेवा आहे. या देशासाठी महापुरुषांनी खूप काही दिले आहे. आता देण्याची जबाबदारी आपली असल्याचे मोदी म्हणाले.




कोण कोणते सदस्य निवृत्त होत आहेत 


निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे सभागृहातील उपनेते आनंद शर्मा, ए. के. अँटनी, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, मेरी कोम आणि स्वप्ना दासगुप्ता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सुरेश प्रभू, एम. जे. अकबर, जयराम रमेश, विवेक तन्खा, व्ही. विजयसाई रेड्डी यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे. जुलैमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, कपिल सिब्बल, सतीश चंद्र मिश्रा, संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि के. जे. अल्फोन्स यांचा समावेश आहे. काही केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल. त्याचवेळी काँग्रेसच्या काही सदस्यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत स्थिती स्पष्ट नाही. यापैकी अनेक सदस्यांचा G-23 मध्ये समावेश आहे ज्यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: