नवी दिल्ली : गेल्या 5 महिन्यांत देशात 60 वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. वाघांच्या मृत्यूच्या अधिकृत आकडेवारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मृत पावलेल्या वाघांचे वयोमान 4 ते 8 वर्षांदरम्यान आहे.


जानेवारी 2017 ते मे 2017 या कालावधीत मध्य प्रदेश ,कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि इतर अशा 10 राज्यांमध्ये ह्या वाघांचा मृत्यू नोंदवला गेला आहे.  यात मध्यप्रदेश व कर्नाटक या दोन राज्यात पाच महिन्यांत सर्वाधिक प्रत्येकी 13 वाघांचा मृत्यू झाला. तर या पाठोपाठ उत्तराखंडमध्ये 9 वाघ दगावले. या आकडेवारीनुसार, जिम कार्बेट या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक मृत्यूंची नोंद घेण्यात आलेली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात आठ वाघांचे मृत्यू झाल्याचे यावेळी नोंदवण्यात आलं आहे. यामध्ये 14 जानेवारी रोजी खापा व पूर्व पेंच प्रकल्पात, 14 फेब्रुवारी रोजी कोलितमारा, 14 एप्रिल पेंच, मानसिंगदेव, 27 एप्रिल ब्रम्हपुरी, 3 मे सावली, 18 मे तळोधी व 26 मे रोजी चिचपल्ली येथे उष्माघातामुळे वाघिणीचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ आसाममध्ये सात वाघांचा मृत्यू झालेला आहे. उत्तरप्रदेशात चार, तामिळनाडूमध्ये दोन तर छत्तीसगड, ओडिशा व केरळ या राज्यात प्रत्येकी एका वाघाच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे.

दरम्यान, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय तसेच राज्याच्या वन विभागाकडून व्याघ्र संरक्षणाऐवजी व्याघ्र पर्यटनाला अवास्तव महत्त्व दिल्यामुळे, आणि व्याघ्र संरक्षणाकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळेच वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याची टीका वन्यजीव प्रेमी करत आहेत.