बेळगाव : पोहण्यास गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना दुपारी तीनच्या सुमारास मणूर गावात घडली. शाळांना सुट्टी पडल्यामुळे गावातील मुले दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यास गेली होती.


पोहायला येत नव्हते म्हणून या मुलांनी त्यांनी पाठीवर डबे  बांधण्यासाठी नेले होते. पोहण्यासाठी ही तीन मुले पाण्यात उतरली. पाण्यात उतरल्यावर त्यांच्यापैकी एकजण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवायला अन्य दोन मुले गेली. पण त्यांच्यापैकी कोणालाही पोहायला येत नसल्यामुळे तिन्ही मुले पाण्यात बुडू लागली. मुले पाण्यात बुडायला लागल्यावर बाजूला बसलेल्या मुलांची भीतीने गाळण उडाली. त्या मुलांनी घाबरून गावात पळत जाऊन मुले बुडालेली घटना सांगितली. लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. लगेच मुलांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले पण तोपर्यंत तिन्ही मुले मृत झाली होती.

गावात तीन मुले बुडल्याची बातमी पसरली आणि  हे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली. साहिल मनोहर बाळेकुंद्री (14), आकाश कल्लाप्पा चौगुले(14) आणि भूषण कल्लाप्पा चौगुले (12) अशी बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.

साहिल आणि आकाश हे आठवीत शिकत होते, तर भूषण हा चौथीत शिकत होता. तिघांचे मृतदेह पोस्टमॉर्टम करून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.