अंदमान-निकोबारमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका
एबीपी माझा वेब टीम | 10 Dec 2016 09:00 AM (IST)
पोर्ट ब्लेयर (अंदमान): चक्रीवादळामुळं अंदमान इथं अडकून पडलेल्या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. २ हजार ३७६ प्रवाशी गेल्या काही दिवसांपासून अंदमानमध्ये अडकून पडले होते. ज्यात महाराष्ट्रातल्याही ५०हून अधिक लोकांचा समावेश होता. पोर्टब्लेअरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या नील बेटावर 5 डिसेंबरला अचानक पाऊस आणि वादळ सुरु झालं होतं. ज्यामुळे हवाई आणि जलवाहूतक थांबवण्यात आली होती. मात्र बचावदलानं या सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका केल्यानं त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, मंगळवारपासून अंदमान निकोबार बेटांवर जोरदार पाऊस सुरु झाला होता. वेधशाळेच्या माहितीनुसार अंदमान भागात ताशी 50 ते 65 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. जोरदार हवा वाहत असल्यामुळे घटनास्थळी मदत पाठवण्यात अडथळे येत होते. दरम्यान यावर मात करत बचाव दलानं सर्व प्रवाशांची सुखरुपपणे सुटका केली.