श्रीनगर : कुख्यात दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये सुरु झालेला हिंसाचार कायम आहे. या हिंसाचारात चार दिवसात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोनशेहून अधिक जण जखमी आहेत. जखमींमध्ये सुमारे शंभर जवनांचा समावेश आहे.


 

काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित आहेत.

 

दुसरीकडे काश्मीर मुद्द्यावरुन राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली.



अनेक भागात कर्फ्यू कायम

काश्मीरमधील शोपियां, पुलवामा, कुलगाम आणि अनंतनाग परिसरात आजही कर्फ्यू कायम आहे. सर्व फुटीरतावादी नेत्यांना नजरबंद करुन ठेवण्यात आलं आहे. तर पावला-पावलाला सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

 

8 जुलैपासून धग

का धुमसतंय काश्मीर?

तीन दिवसांपूर्वीच हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी याला कंठस्नान घालण्यात आलं. जवानांनी आठ जुलैला अनंतनाग जिल्ह्यात बुरहानचा खात्मा केला. दीर्घ काळ चाललेल्या या चकमकीत बुरहानसोबत तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं.



गेल्या 24 वर्षांत स्वतःचा आणि आपल्या साथीदारांचा फोटो सोशल मीडियावर टाकणारा बुरहान हा पहिला कमांडर होता.

 

9 जुलैला धग पेटली- बुरहानच्या खात्म्यानंतर धगधग

बुरहानच्या खात्म्यानंतर फुटरतावादी नेत्यांनी 9 जुलैला बंदचं आवाहन केलं. या बंदचे पडसाद लक्षात घेत, प्रशासनाने काश्मीरच्या अनेक भागात कर्फ्यू जारी केला.

 

बुरहानच्या अंत्यविधीला तमाम गर्दी

फुटीरतावाद्यांसह अनेकांना जमावबंदीचा आदेश झुगारुन 9 जुलैला बुरहानच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी जमावाने हिंसक पद्धतीने विरोध प्रदर्शित केला होता. त्यामुळे प्रशासनाला जिल्ह्यात मोबाईल, इंटरनेटवर बंदी घालावी लागली. तसंच अमरनाथ यात्राही रोखण्यात आली.

 

10 जुलै

हिंसक जमावाने अनंतनागमध्ये एका पोलिसाला त्याच्या गाडीसह झेलम नदी फेकलं. यामध्ये त्या पोलिसाचा मृत्यू झाला. तर त्राल आणि शोपियांमध्ये हिंसक जमावाने दोन पोलिसांना लक्ष्य केलं.

 

हिंसक प्रदर्शनादरम्यान झालेल्या गोळीबारात पाच नागरिकांचा मृत्यू झाला.

 

मुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहन

काश्मीर पेटलं असताना, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

 

11 जुलै

काश्मीरच्या अनेक भागात आजही कर्फ्यू लाग आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहेत. तर अमरनाथ यात्रा सलग तिसऱ्या दिवशीही रखडलेली आहे.

संबंधित बातम्या

हिजबुलचा पोस्टरबॉय, दहशतवादी बुरहान वाणीला कंठस्नान 


बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार, 13 जणांचा मृत्यू